हैदराबाद : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेच्या एक दिवस आधी, शनिवार, २० जून रोजी हैदराबादच्या मियापूर परिसरात एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात आत्महत्या केली.
शेख सनाअसं मृत तरुणीचं नाव आहे. सना वर्षभरापासून नीट परीक्षेची तयारी करत होती. ती आई वडील आणि दोन लहान भावंडांसोबत मियापूरमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. पण शनिवार सनाने आपल्या घरातच आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी सनाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत सनाने “माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी माझे जीवन संपवत आहे”; असे नमूद केले आहे.
https://prahaar.in/2026/06/20/neet-ug-re-exam-on-sunday-unprecedented-security-measures-to-prevent-paper-leaks/
शैक्षणिक दबाव आणि परीक्षेशी संबंधित चिंता असह्य झाल्यामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. पोलिसांना प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, सना वर्षभरापासून नीट परीक्षेची तयारी करत होती. तिने इंटरमिजिएट परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. शनिवारी सकाळी, सनाने अभ्यासासाठी खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. तिच्या लहान बहिणींनी तिला जेवणासाठी हाक मारल्यावर तिने प्रतिसाद न दिल्याने घरच्यांनी दरवाजा ठोठावला. काही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. दार तोडून आत प्रवेश करताच सगळ्यांना खोलीत आत्महत्या केलेल्या सनाचा मृतदेह दिसला. हे दृश्य बघून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शविविच्छेदनासाठी ताब्यात घेतला तसेच पंचनाम्याची कारवाई सुरू केली. सनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/21/wife-swapping-racket-exposed-in-surat/
चूक कोणाची ?
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील अनेक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यांना नव्याने परीक्षेसाठी तयारी सुरू करावी लागली. मोटेगावकर सारख्या फक्त आर्थिक लाभांचा विचार करणाऱ्या खासगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या व्यक्तीने केलेल्या कृत्याची शिक्षा इतरांना मोठ्या प्रमाणात भोगावी लागली आहे. नीट परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरफुटीमुळे नाहक त्रास सहन करून दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करावी लागली. ज्यांचे पेपर खूप छान गेलेत त्यांनी ही परीक्षा पुन्हा का द्यावी ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र शिक्षणविभागाने नीट परीक्षा पुन्हा नियोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नीटची फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात नीट (NEET) परीक्षार्थींच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच ही ताजी घटना घडली आहे.