मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात आज एकाच दिवसात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सोन्याच्या दरात तब्बल ४,६०० रुपयांची घट झाली असून दर १,४४,९०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात १२,००० रुपयांची मोठी घसरण होऊन ती २,३७,००० रुपयांवर आली आहे. या अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारात चर्चेला उधाण आले आहे.
जळगावातील सुवर्ण व्यावसायिक सुशील बाफना यांनी या घसरणीमागील कारणांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते सोनं-चांदीच्या दरात घसरण होण्यामागे जागतिक आणि देशांतर्गत अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे.
जागतिक कारणांचा मोठा प्रभाव :
अमेरिका-इराण तणाव आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यामुळे अनेक देशांच्या आर्थिक स्थितीवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी विविध देशांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील सोन्याची खरेदी थांबली आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि अपेक्षित बदल न झाल्यानेही गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2026/06/20/rajmata-jijau-womens-empowerment-scheme-major-decision-by-the-fadnavis-government-widows-of-farmers-who-committed-suicide-to-receive-land-for-just-%e2%82%b91/
देशांतर्गत मागणी घटली :
देशात सध्या लग्नसराई नसल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “अनावश्यक सोने खरेदी टाळा” या आवाहनालाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने खरेदीत घट झाल्याचे सांगितले जात आहे. मागणी कमी झाल्यामुळे दरांवर थेट दबाव आला आहे.
एका दिवसातील मोठी घसरण :
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार:
१८ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१,४८,०९३
१९ जून रोजी दर: ₹१,४४,९७०
एका दिवसात ₹३,१२३ ची घसरण
तर
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१,३५,६५३
नवा दर: ₹१,३२,७९३
₹२,८६० ची घट
चांदीच्या दरात तब्बल ₹१२,००० ची घसरण नोंदवली गेली आहे.
https://prahaar.in/2026/06/20/best-strike-best-strike-continues-for-the-second-day-talks-with-the-administration-have-failed-mumbaikars-face-travel-disruptions-once-again/
बाजारात अनिश्चिततेचे वातावरण :
तज्ज्ञांच्या मते सध्या जागतिक आर्थिक घडामोडी, व्याजदरातील अनिश्चितता आणि देशांतर्गत मागणीतील घट यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत दर स्थिर होतात की आणखी बदल होतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.