सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे
एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावी
शून्य जीवितहानीचे उद्दिष्ट्य समोर ठेवून सर्वांनी एकत्रितरित्या काम करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई :– मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांनी एकत्रितपणे समन्वय साधून या कामांना गती द्यावी असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले. तसेच रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवून, काम चालू असलेल्या रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणावेत, तसेच जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावे असेही सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि मुंब्रा येथे गतवर्षी दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाटात सुरू असलेल्या सुरक्षा कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या दोन्ही ठिकाणी ७० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. यंदाचा मॉन्सून काळात शुन्य जीवितहानी व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयाने पण दक्ष राहून काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
https://prahaar.in/2026/06/15/deputy-chief-minister-shinde-reviewed-pre-monsoon-preparations-in-mumbai/
ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी संदीप माने, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवीन सोना, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी दरवर्षी त्याच त्याच इमारतींना धोकादायक घोषित करण्याऐवजी त्यांची दुरुस्ती करायला हवी असे शिंदे यांनी सुचवले. भिवंडी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मुंब्रा या हद्दीतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेद्वारे पुनर्विकास करण्यासाठी ठाणे मनपाच्या धर्तीवर क्लस्टर सेल स्थापन करून या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सबंधित मनपाच्या आयुक्तांना दिले. तसे झाले तरच धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून जगणाऱ्या लोकांना कायमचा दिलासा मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/06/15/is-there-a-connection-between-sanchita-ugales-suicide-and-sushant-singh-rajput/
याशिवाय यंदाच्या मान्सून लांबला असल्याने नालेसफाईला अतिरिक्त वेळ मिळाला असून त्यामुळे उरलेली नालेसफाई वेगाने पूर्ण करावी असे त्यांनी सांगितले. तसेच रेल्वेच्या हद्दीतील नाले वेगाने स्वच्छ करावे तसेच त्याची पाहणी करण्यासाठी एक नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी असेही सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर इतर मनपानी देखील टीडीआरएफप्रमाणे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच प्रत्येक मनपा हद्दीतील लोकांना त्वरित मदत करण्यासाठी २४ तास कंट्रोल रूम सुरू कराव्यात असेही सांगितले.
जिल्ह्यात होर्डिंग्ज पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, झाडे वाहनावर कोसळून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने झाडांची छाटणी करून घ्यावी.आपत्कालीन परिस्थिती मध्ये रेल्वेसेवा बंद झाल्यास प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्लॅन तयार ठेवा, सखल भागात पाणी काढण्यासाठी लावलेले पंप सुरू आहेत की नाही याची खातरजमा करा असे सुचवले.
https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/
पावसाळ्यापूर्वी साथीचे रोग पसरू नयेत याची दक्षता घ्या, शहरी तसेच ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध साठा ठेवा. सर्पदंशाची पुरेशी औषधे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून द्या. ग्रामीण भागात नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना वेळेवर सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी लाईफ जॅकेट, बोट यांची सज्जता ठेवा. छोट्या मनपाना तातडीने काही कामे करायची असल्यास त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून तत्काळ निधी उपलब्ध करून द्या असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले.
जिल्ह्यातील मान्सून परिस्थिती हाताळताना व्यवस्थेने अलर्ट रहावे. सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करावे. आपत्ती व्यवस्थापन करताना स्थानिक लोकप्रतिनिधीशी समन्वय साधावा असे सांगितले. यंदाचा मान्सून समाधानकारक होणार असला तरीही आपत्ती व्यवस्थापनात कुठेही कसूर व्हायला नको, लोकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी सज्ज राहून काम करावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.