परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे भावनिक आवाहन
मुंबई, दि. १२ जून : “एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र आंदोलनाच्या मार्गाने प्रवाशांना वेठीस धरू नका,” असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
शिव-परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित अभिनंदन व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/06/12/nashik-crime-gold-jewellery-stolen-from-inside-a-rickshaw/
सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५६ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल, तेव्हा ती वाढ एसटी कर्मचाऱ्यांनाही आपोआप लागू होईल. त्यामुळे महागाई भत्त्यासाठी भविष्यात आंदोलन करण्याची गरज भासणार नाही.
याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित आर्थिक मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
https://prahaar.in/2026/06/12/pune-online-gaming-scam-call-centres-12-booked-illegal-pistol-seized/
यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक साद घालत सांगितले की, “१५ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी एसटीवर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्याचा आधार एसटी आहे. अशा वेळी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे प्रवास आणि सर्वसामान्यांच्या जगण्याची घडी विस्कटू नये. कर्मचाऱ्यांच्या भावना आम्हाला समजतात, पण जनतेची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेणे आपले सामूहिक कर्तव्य आहे.”
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील असून उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देत, “संवादाचा मार्ग खुला आहे; संघर्षाऐवजी समन्वयातूनच सर्वांचे हित साधले जाईल,” असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.