कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार
मुंबई : कोकण किनारपट्टीवरील मालवाहतूक आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि ‘ऑल वेदर’ बंदर म्हणून ओळखले जाणारे जयगड बंदर आता थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याशी जोडले जाणार आहे. यासाठी ‘जयगड बंदर-चिपळूण-सातारा’ असा स्वतंत्र द्रुतगती महामार्ग (एक्सप्रेस-वे) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे साडेपाच तासांचे हे अंतर अवघ्या एका तासात कापता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास राज्यातील कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना किनारपट्टीशी जोडणी मिळणार आहे.
https://prahaar.in/2026/06/11/life-threatening-attack-on-food-officials-in-chhatrapati-sambhajinagar/
जवळपास ९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा ९८ किलोमीटर लांबीचा महामार्ग रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या चार महत्त्वाच्या जिल्ह्यांतून जाणार आहे. जयगड हे खोल पाण्याचे बंदर म्हणून ओळखले जाते. त्याची १७.५ मीटर इतकी आहे. या बंदराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बंदर वर्षभर, ३६५ दिवस मालवाहतुकीची हाताळणी करते. कोणत्याही हवामानात हे बंदर कार्यान्वित असते. सध्या आंबा, काजू आणि मासे निर्यातीचे ‘हब’ म्हणून या बंदराचा विकास केला जात आहे. त्यामुळे येथील मालाची देशांतर्गत बाजारपेठेत जलद वाहतूक व्हावी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढावी, या उद्देशाने या एक्सप्रेस-वेची आखणी करण्यात आली आहे.
कधीपर्यंत पूर्ण होणार?
– हा प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर असून त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पाचा सविस्तर बृहत आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी ‘एनएचएआय’कडून लवकरच एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.
– सल्लागाराच्या अहवालानंतर महामार्गाची अंतिम लांबी, तो नेमका किती मार्गिकेचा (लेन) असेल, त्यात किती पूल किंवा बोगदे असतील, तसेच तो कोणकोणत्या गावांमधून जाईल हे निश्चित होईल.
– या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया राबवली जाईल. हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेशी जोडणारा मुख्य मार्ग ठरणार असला, तरी प्रवाशांना या तासाभराच्या प्रवासासाठी पुढील काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.