बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने (Boat capsizing) मोठी दुर्घटना घडली. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू (3 Women Death) झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. बोट बुडत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
https://prahaar.in/2026/06/11/boat-accidents-in-maharashtra-tragic-incident-in-gondia-two-youths-drown-after-boat-capsizes/
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेले भाविक नदी पार करण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते. यावेळी अचानक बोटीचा ताबा सुटल्याने ती नदीपात्रात उलटली. बोटीत 50 हून अधिक भाविक असल्याची माहिती समोर आली असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळेच दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे.
या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड (रा. लोणार) यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. तर कांताबाई ज्ञानदेव आंधळे (रा. सिंदखेडराजा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. सिंधुबाई अर्जुन मावळे (रा. महागाव) यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/11/thane-drug-trafficking-major-operation-by-thane-police-drugs-worth-%e2%82%b93-crore-originating-from-pakistan-seized-two-smugglers-from-kashmir-arrested/
दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का, तसेच अपघातामागील नेमके कारण काय, याचा तपास उपविभागीय अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.