मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन
मुंबई : देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ कार्यरत असलेले पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवसांचा विक्रम प्रस्थापित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. ‘समर्थ भारत ते विकसित भारत’ हा देशाचा प्रवास मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत अभूतपूर्व झेप घेतली आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हा आत्मविश्वास मोदी यांच्या नेतृत्वातूनच अधिक बळकट झाला. यापुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राचे सहकार्य आणि आशीर्वाद कायम राहतील, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.१० जून रोजी लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी ‘विकसित भारत’ या संकल्पनेमुळे देशात नव्या आत्मविश्वासाचा उदय झाल्याचा उल्लेख केला आहे. २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यापासून संरक्षण सामग्रीची निर्यात करणाऱ्या राष्ट्रापर्यंत भारताचा झालेला प्रवास मोदी यांच्या नेतृत्वाची देणगी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच मोदी यांचे वर्णन आपण सातत्याने ‘भारताचे वैश्विक नेतृत्व’ असे करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/06/10/chandrashekar-bawankule-separate-ready-reckoner-rates-now-for-skyscrapers-and-slums/
मुख्यमंत्री म्हणून काम करताना मोदी यांचे सातत्याने पाठबळ लाभल्याबद्दल फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची भूमिका राष्ट्रीय स्तरावर समर्थपणे मांडण्याची संधी मिळाल्याचे सांगतानाच राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने दिलेल्या सहकार्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.हवामान बदल आणि एल-निनोमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात महाराष्ट्राला केंद्राने दिलेल्या मदतीची आठवण करून देताना फडणवीस यांनी २०१५ च्या तीव्र दुष्काळानंतर मंजूर झालेल्या विशेष आर्थिक पॅकेजचा उल्लेख केला. या पॅकेजच्या माध्यमातून ४०० हून अधिक प्रकल्प पूर्ण करता आले तसेच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना राबविता आल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित विषयांमध्येही केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न, मराठी भाषेला अभिजात दर्जा, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच इंदूमिल स्मारकासंदर्भातील निर्णय यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
https://prahaar.in/2026/06/10/incident-at-jupiter-hospital-ola-guy-hits-old-man/
पायाभूत प्रकल्पांना मोदींमुळे गती
राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यामुळे गती मिळाल्याचे सांगताना फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ यांचा उल्लेख केला. पुढील पाच दशकांच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा आणि लाखो रोजगार निर्माण करणारा वाधवान बंदर प्रकल्पही मोदी यांच्या पाठबळामुळे पुढे सरकत असल्याचे त्यांनी नमूद केले.अमरावतीतील टेक्स्टाइल पार्कला मिळालेला ‘मेगा टेक्स्टाइल पार्क’चा दर्जा, छत्रपती संभाजीनगरमधील डीएमआयसी आणि औरिक सिटी, दिघी पोर्ट तसेच गडचिरोलीतील औद्योगिक विकासाच्या संकल्पनांचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. माओवादमुक्तीनंतर गडचिरोली हे विकासाचे राष्ट्रीय मॉडेल म्हणून उदयास येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.