मुंबई : पुढील २ दिवसांमध्ये केरळसह तमिळनाडूमध्ये मान्सून धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक वातावरण असून आज ६ जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज आहे. तर पुढील ५ दिवस काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
https://prahaar.in/2026/06/01/high-level-committee-for-drug-free-mumbai/
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढताना दिसत असून २ जून रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील ५ , उत्तर महाराष्ट्रातील ४, पश्चिम महाराष्ट्रातील २, मराठवाड्यातील ४ आणि विदर्भातील ८ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/01/over-97000-applications-received-for-mhadas-2640-homes-massive-response-from-mumbaikars/
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद होऊ शकते. किनारपट्टी भागातील नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/01/bkc-vakola-road-opening-soon/
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल आणि कृषी उपकरणांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहण्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून वातावरणात आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.