मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण
मुंबई : “आधुनिक काळात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडियाच्या प्रचंड विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणती बातमी किती वेगाने प्रसारित झाली, यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मूल्याधिष्ठित पत्रकारिता आजच्या काळातही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
https://prahaar.in/2026/06/01/it-is-not-okay-for-men-to-take-advantage-of-their-beloved/
या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, राजहंस सिंह, मुरजी पटेल, संजय उपाध्याय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदी पत्रकारितेच्या गौरवशाली प्रवासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदी पत्रकारितेचा इतिहास अत्यंत समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यात तिचे योगदान अतुलनीय राहिले आहे. ‘उदन्त मार्तण्ड’ या देशातील पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या या प्रवासाने भारताच्या सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला नेहमीच योग्य दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक राष्ट्रनेत्यांनी पत्रकारितेचा प्रभावी वापर करून जनतेमध्ये राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले, याची आठवण त्यांनी करून दिली.
https://prahaar.in/2026/06/01/majhi-kanya-bhagyashree-yojana/
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील ऐतिहासिक संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात एक नैसर्गिक जवळीक आहे. जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, मातृभाषेतून घेतलेले शिक्षण ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करण्यास मदत करते. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला दिलेले प्राधान्य देशाच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.