खा. नारायण राणे; ‘यूपीएससी’ उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांना दिला मोलाचा सल्ला
मुंबई : “देश आणि राज्याच्या शाश्वत विकासासाठी शासन आणि प्रशासन ही दोन चाके एकत्रितपणे आणि ताकदीने धावणे गरजेचे आहे, तरच देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने गतिमान होईल,” असा मोलाचा सल्ला भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. युवा उत्थान फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दि. ३० मे रोजी आयोजित ‘सुशासनाचे प्रशासक’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत भावी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी आपल्या ४१ वर्षांच्या राजकीय व प्रशासकीय अनुभवांचे दाखले देत भावी सनदी अधिकाऱ्यांना लोकसेवेचा मूलमंत्र दिला.
https://prahaar.in/2026/05/30/maratha-and-kunbi-are-two-different-social-groups/
या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल (भाप्रसे) आणि केंद्रीय जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मल्लिनाथ जेउरे (आयआरएस) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नारायण राणे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मी जेव्हा इन्कम टॅक्समधील नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा माझी कोणाशीही ओळख नव्हती. तिथे मला मनोहर साळुंखे नावाचे एक गृहस्थ भेटले, ज्यांनी मला ओळख नसतानाही धीर दिला आणि मदत केली. पुढे जाताना ते मला म्हणाले होते की, मी तुला ओळख नसताना मदत केली आहे, आता तू तुझ्या आयुष्यात गरजूंना मदत कर, त्यातच मला धन्यता वाटेल,” अशी आठवण राणे यांनी सांगितली. “आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला अनेक अनोळखी माणसे मदत करतात, आपणही दुसऱ्यांच्या प्रवासात त्यांना सहकार्य केले पाहिजे, ज्यामुळे समाज आणि देश दोन्ही मोठे होतील,” अशी शिकवण त्यांनी तरुणांना दिली.
https://prahaar.in/2026/05/30/mumbai-mandwa-ro-ro-service-regular-during-monsoon-for-passengers/
खा. राणे म्हणाले, “माझ्या मनात तीन क्षेत्रांबद्दल नेहमीच आदर राहिला आहे, एक शिक्षक, डॉक्टर आणि आयएएस अधिकारी. आज मुंबई, महाराष्ट्र किंवा देशाचा जो विकास दिसतोय, त्यात राजकीय नेत्यांसोबत अधिकाऱ्यांच्या अभ्यासाचा मोठा वाटा आहे. डोळे असून चालत नाही, तर डोळसपणा असायला हवा. आपल्या अधिकाऱ्यांनी हे राज्य आणि देश घडवला, असे उद्गार लोकांनी काढले पाहिजेत, असा अभ्यास व मेहनत तुम्ही करावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा जो संकल्प केला आहे, तो पूर्ण करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांचे योगदान राजकारण्यांइतकेच महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करा!
https://prahaar.in/2026/05/30/death-of-a-mathadi-worker-at-a-government-grain-godown-on-nashik-road/
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील काही धाडसी निर्णयांचा उल्लेख करत राणे यांनी अधिकाऱ्यांना निर्भीडपणे काम करण्याचे आवाहन केले. “तुम्ही आता ज्या पदांवर जात आहात, तिथे कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देणे, हेच तुमचे मुख्य ध्येय असले पाहिजे. आपल्या कर्तव्याशी आणि नैतिकतेशी नेहमी प्रामाणिक राहा,” असा सल्ला देत त्यांनी सर्व यशस्वी उमेदवारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी या उपक्रमाचे आयोजक अमोल गवळी आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.