– अवघ्या ४४.९८ सेकंदांत ४०० मीटरची शर्यत फत्ते
रांची (वृत्तसंस्था) :
भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल अशी अभूतपूर्व आणि विस्मयकारक कामगिरी तामिळनाडूच्या २२ वर्षीय विशाल टी.के. याने करून दाखवली आहे. रांची येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत, पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत विशालने ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहास घडवला.
https://prahaar.in/2026/05/25/neet-paper-leak-case-major-action-in-neet-paper-leak-case-accused-manisha-havaldar-arrested/
अंतिम फेरीत त्याने विजेच्या वेगाने धावत अवघ्या ४४.९८ सेकंदांत अंतर पार केले. भारताच्या ट्रॅक अँड फील्ड इतिहासात ४५ सेकंदांचा ‘अभेद्य’ मानला जाणारा अडथळा पार करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय धावपटू
ठरला आहे.
https://prahaar.in/2026/05/25/uttarakhand-news-a-thrilling-attack-on-mumbai-tourism-in-uttarakhand-an-attempt-was-made-to-push-them-into-a-valley-in-front-of-the-police/
भारतात ४०० मीटर शर्यतीची खरी ओळख ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंग यांच्या १९६० च्या रोम ऑलिम्पिकमधील ४५.६ सेकंदांच्या ऐतिहासिक धावण्यापासून सुरू झाली होती. त्यानंतर अरोकिया राजीव आणि मोहम्मद अनस याहिया यांनी भारताला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले. मात्र, विशालच्या या झंझावाती धावण्याने आजवर अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाला वास्तवात आणले असून भारतीय धावपटूंच्या जागतिक क्षमतेला एक नवे आणि सर्वोच्च परिमाण दिले आहे. शर्यतीची पिस्तूल डागताच विशालने सुरुवातीपासूनच चित्त्याच्या चपळाईने आघाडी घेतली. शेवटच्या वळणावर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पुरते मोडीत काढत त्याने अंतिम रेषा ओलांडली. जेव्हा वेळ फलकावर ‘४४.९८ सेकंद’ हा जादुई आकडा झळकला, तेव्हा संपूर्ण स्टेडियमने उभे राहून त्याला दाद दिली. त्याचे वडील थेन्नारसु यांनी तात्काळ ट्रॅकवर धाव घेत आपल्या सुपुत्राला घट्ट मिठी मारली, तर कठोर शिस्तीसाठी जगप्रसिद्ध असलेले त्याचे जमैकन प्रशिक्षक जेसन डॉसन यांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू वाहू लागले.
https://prahaar.in/2026/05/25/twisha-sharma-case-lost-life-due-to-fear-of-what-will-society-say-important-hearing-in-supreme-court-today/
दशक्रीडेत तेजस्विन शंकरचा जादूई टप्पा पार :
४०० मीटरमधील ऐतिहासिक कामगिरीसोबतच याच राष्ट्रीय स्पर्धेत भारताचा स्टार ॲथलीट तेजस्विन शंकर याने पुरुषांच्या ‘दशक्रीडा’ प्रकारात महाविक्रमी कामगिरी केली. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या क्रीडा प्रकारात तब्बल ८,०५७ गुण मिळवत तेजस्विनने ८००० गुणांचा जादूई टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय बनण्याचा बहुमान मिळवला. या कामगिरीसह त्याने आगामी राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीटही पक्के केले आहे. दशक्रीडेतील अखेरच्या १५०० मीटर शर्यतीपूर्वी तेजस्विनवर वेळेचा प्रचंड दबाव होता. विक्रम करण्यासाठी त्याला एका विशिष्ट वेळेत शर्यत संपवणे अनिवार्य होते. अशा तणावाच्या क्षणीही कमालीचा संयम राखत त्याने धाव घेतली. शेवटच्या टप्प्यात “आता संधी हुकवायची नाही” याच जिद्दीने त्याने आपला वेग कमालीचा वाढवला आणि ४ मिनिटे ३९ सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रमावर आपले नाव कोरले. या अभूतपूर्व यशानंतर भावुक झालेल्या तेजस्विनने सांगितले, यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये माझे हे लक्ष्य अगदी थोडक्यात हुकले होते. त्यामुळे यावेळी कोणतीही कसर सोडायची नव्हती. आयुष्यात अशा संधी वारंवार मिळत नाहीत, हे मला ठाऊक होते. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत मी माझी संपूर्ण ताकद पणाला लावली.