मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत अभियंता वर्गासाठी अद्यापही सहा दिवसांचे कामकाज सुरू आहे. अभियंता संवर्गात जवळपास एक हजार पदे रिक्त असल्याने कार्यरत अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे एकाच प्रशासनातील समान स्वरूपाची व समकक्ष जबाबदारी कामे करणाऱ्या अभियंता वर्गामधील या भिन्न कार्यपध्दतीमुळे विभाग कार्यालयातील अभियंता वर्गात असंतोषाची व अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
https://prahaar.in/2026/05/24/maharashtra-dominates-in-sansad-ratna-2026/
महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याबाबत २४ फेब्रुवारी २०२० मध्ये शासननिर्णय जारी करण्यात आला. त्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका प्रशासनाने याबाबत परिपत्रक काढले. मात्र, विभाग कार्यालयामधील अभियंत्यांना या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू व्हावा, यासाठी अभियंता संघटनांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही त्यांना दिलासा मिळालेला नाही.
https://prahaar.in/2026/05/24/air-india-to-reduce-domestic-flights-from-mumbai-cancelling-280-weekly-flights/
विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत अभियंते हे शहराच्या दैनंदिन नागरी सुविधांशी निगडित महत्त्वपूर्ण व अत्यावश्यक कामे पार पाडत असतात. सहा दिवसांच्या कामकाजामुळे अभियंता वर्गावर अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण पडत असून त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता, उत्पादकता, आरोग्य व मनोबलावर परिणाम होत आहे, असे म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी सांगितले. जागतिक स्तरावरील तणावपूर्ण घडामोडी व इंधन दरवाढीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर, इंधन बचत व संसाधनांचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त प्रवास कमी करून इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी करणे, पर्यावरण संरक्षण तसेच प्रशासनिक खर्चात बचत करण्यासाठी विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत अभियंता वर्गासाठी पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणे अधिक उपयुक्त व परिणामकारक ठरेल, असे मत भूतेकर यांनी व्यक्त केले. याबाबत असोसिएशनच्यावतीने त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
https://prahaar.in/2026/05/24/rcb-gt-srh-and-rajasthan-royals-enter-the-playoffs/
विभाग कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू केल्यास प्रशासनिक स्तरावर वीज, पाणी, इंधन, प्रवास खर्च तसेच इतर कार्यालयीन संसाधनांची लक्षणीय बचत होऊ शकते. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेळेची व उर्जेची बचत होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत सकारात्मक वाढ होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले. तसेच, मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागाप्रमाणेच विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत सर्व अभियंता वर्गासाठी समानतेच्या तत्त्वावर पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
विभाग कार्यालयांतील अभियंता वर्गासाठी पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा तातडीने लागू करणे प्रशासनास शक्य नसल्यास समानतेच्या तत्त्वावर अतिरिक्त एका दिवसाच्या कामकाजाबद्दल अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन, विशेष भत्ता किंवा समतुल्य आर्थिक लाभ देण्याचा प्रशासनाने विचार करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले.