पुणे : नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे येथील विशेष न्यायालयात २१ मेपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेऊन ही सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने घेतली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कायदेशीर प्रक्रिया पार पडेल. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अवघ्या १४ दिवसांत तब्बल ११०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. हे दोषारोपपत्र सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेला आरोपीसोबत शेवटचे पाहिल्याचा साक्षीदारांचा पुरावा यावर आधारलेले आहे.
https://prahaar.in/2026/05/19/municipal-corporations-master-plan-to-make-mumbai-water-free/
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले की या तपासात उच्च दर्जाची तांत्रिक पद्धत अवलंबून तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. खटल्याच्या सुरुवातीलाच न्यायालयाने घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती ॲड अजय मिसर यांच्यामार्फत करण्यात आली आहे. हा खटला विक्रमी वेळेत पूर्ण करून आरोपीला कठोर शासन मिळवून दिले जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय दिला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.