रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने, आग लागल्याचे वेळेत लक्षात आल्याने अवघ्या १५ मिनिटांत ६८ प्रवाशांना डब्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही.
https://prahaar.in/2026/05/17/case-of-kidnapping-registered-against-6-people-including-a-congress-corporator/
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग रविवारी पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास गाडीच्या बी- वन (थ्री-टायर एसी) कोचमध्ये लागली. ही ट्रेन तिरुवनंतपुरमवरून दिल्लीकडे जात होती. रतलाम जंक्शनवरून पहाटे ३.४५ वाजता ट्रेन सुटल्यानंतर कोटा रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या विक्रमगढ अलोट आणि लुनिरीच्छा स्थानकांदरम्यान ही घटना घडली. ट्रेनच्या गार्डला डब्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्या. त्याने त्वरित लोको पायलटला (ट्रेन चालक) याची माहिती दिली. त्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
https://prahaar.in/2026/05/17/minor-girl-abducted-and-sexually-assaulted-two-girls-fall-victim-to-lust/
आग लागल्याचे समजताच रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्सचा वीज पुरवठा खंडित केला आणि अग्निशमन मोहीम सुरू केली. बी- वन कोचला लागलेली आग मागे जोडलेल्या दुसऱ्या लगेज-कम-गार्ड व्हॅन डब्यापर्यंत पसरली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर, जळालेला बी- वन कोच आणि खराब झालेला गार्डचा डबा मुख्य ट्रेनपासून वेगळा केला. सकाळी सुमारे ९.४५ वाजता म्हणजेच जवळपास साडेचार तासांनंतर ट्रेन दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. बाधित प्रवाशांना तोपर्यंत कोटा स्थानकापर्यंत इतर डब्यांमध्ये सामावून घेण्यात आले. कोटा स्थानकावर ट्रेनला एक अतिरिक्त डबा जोडण्यात आला.
https://prahaar.in/2026/05/17/khar-tree-collapse-teen-dies-week-after-khar-accident-other-passenger-remains-critical/
दिल्ली-मुंबई रेल्वे मार्ग प्रभावित : या दुर्घटनेमुळे दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या मार्गावरील किमान ५ ते ६ (काही रिपोर्टनुसार ८ ते १०) प्रवासी ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले. अनेक गाड्यांना वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आले होते. प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रतलामचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अजय कुमार कलरा स्वतः देखरेख करत होते. तर दुर्घटनास्थळी मदत ट्रेन आणि टॉवर वॅगन तात्काळ पाठवण्यात आले होते.
https://prahaar.in/2026/05/17/manisha-mandhare-sent-to-cbi-custody-in-neet-paper-leak-case-parents-questioned-by-cbi-in-nanded/
उच्चस्तरीय चौकशी : आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु रेल्वे मंत्रालयाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि तज्ज्ञ जळालेला कोच आणि संबंधित उपकरणांची तपासणी करत आहेत. याशिवाय, सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय रेल्वे नेटवर्कमधील सर्व ट्रेनच्या डब्यांच्या अग्निसुरक्षा यंत्रणेचे देशव्यापी ऑडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दोन आठवड्यांतील दुसरी घटना : विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांतील ही अशी दुसरी घटना आहे. यापूर्वी, १५ मे रोजी संध्याकाळी हैदराबाद-जयपूर स्पेशल एक्सप्रेसच्या दोन एसी कोचला (बी-वन आणि बी- टू) हैदराबादच्या नामपल्ली रेल्वे स्थानकावर उभे असताना आग लागली होती. सुदैवाने त्याही घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते.