जळगाव : गेल्यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अनपेक्षित हजेरी लावली होती. तशीच परिस्थिती यंदाच्या मे महिन्यात उद्भवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात रब्बी पिकांसह चाऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. हा कडवट अनुभव गाठीशी असलेला बळीराजा यावर्षी कमालीचा सावध झाला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रब्बीची कामे उरकून खरिपासाठी शेत तयार ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
पाचोरा तालुक्यात गव्हाची काढणी पूर्ण झाली असून भुईमूग, ज्वारी आणि मका यांसारख्या लांब पल्ल्याच्या पिकांची काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या शेतात मका काढणी, चारा कुट्टी करणे आणि तो सुरक्षित स्थळी साठवणे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही सर्व कामे पूर्णपणे यांत्रिकीकरणावर अवलंबून असल्याने कडबा कुट्टी मशिन, मका हार्वेस्टिंग मशिन, खत वाहतुकीसाठी ट्रॅक्टर या मशिनरी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होताना दिसत आहे. अवकाळी पाऊस कधीही येऊ शकतो. या भीतीने शेतकरी या मशिनरीवाल्यांच्या मागे धावत असल्याचे चित्र आहे. (Pre-Monsoon Farming Work )
https://prahaar.in/2026/05/13/trimbakeshwar-simhastha-kumbh-melas-emblem-unveiled/
पीक बदलाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यावर्षी पावसाळा काहीसा ‘तुटक’ स्वरूपाचा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती नियोजनावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिक निवडीकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. मागील हंगामातील अनुभव लक्षात घेऊन शेतकरी अधिक शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय शोधत आहेत. त्यामुळे यंदा कापूस क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/13/national-commission-for-womens-report-on-corporate-jihad/
शेत सज्जतेसाठी लगबग
रब्बी पिकांची आवराआवर झाल्यानंतर शेतकरी लगेच खरिपाच्या पूर्वतयारीला लागला आहे. शेत नांगरटी, रोटावेटर फिरवणे आणि शेतात शेणखत पसखणे या कामांनी वेग घेतला आहे. शेत वेळेवर तयार असेल तरच पावसाच्या पहिल्या सरीसोबत पेरणी करता येईल, या हिशोबाने शेतकरी कामात गर्क आहेत. अवकाळीने चारा खराब होऊ नये, ही यावर्षी शेतकऱ्यांची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
https://prahaar.in/2026/05/13/rcb-vs-kkr-kolkata-vs-rcb-face-off-today-in-ipl-kolkata-ready-for-fifth-consecutive-win/
अनिश्चित पावसात कापसाकडे कल
जाणकारांच्या मते, पावसातील अनिश्चितता पाहता कापूस हे अधिक शाश्वत पीक ठरू शकते. रब्बीची आवराआवर झाली असून खरीपाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यातील शेतकरी सज्ज झाला आहे.