कल्याण : कल्याणमधील सांस्कृतिक ओळख मानल्या जाणाऱ्या आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिराच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकप्रिय बालनाट्य ‘अलबत्या गलबत्या’च्या कलाकारांनी नाट्यगृहातील गैरसोयींविरोधात संताप व्यक्त करत सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर कलाकार, प्रेक्षक आणि नाट्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत कलाकारांनी आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याचा इशाराच दिला आहे.
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/05/13/riteish-deshmukh-raja-shivaji-movie-box-office-collection-12th-day/
प्रयोगादरम्यान वारंवार होणारे शॉर्ट सर्किट, इलेक्ट्रिक स्पार्किंग आणि बंद पडलेली वातानुकूलित यंत्रणा यामुळे कलाकारांना आणि प्रेक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अत्रे नाट्यगृहाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे. नाटक सुरू असतानाच इलेक्ट्रिक स्पार्किंग (electric sparking) होत असल्यामुळे अनेक वेळा प्रयोग थांबवण्याची वेळ येते. यामुळे केवळ नाटकाच्या सादरीकरणात अडथळे निर्माण झाले नाहीत, तर प्रेक्षक आणि कलाकारांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी व्हिडिओमध्ये प्रशासनावर जोरदार टीका करत नाट्यगृहातील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नाटक सुरू असताना वारंवार स्पार्किंग होत असल्याने कलाकारांना भीतीच्या वातावरणात काम करावे लागते. त्याचबरोबर एसी (AC) बंद असल्याने प्रचंड उकाड्यात प्रयोग करावे लागत आहेत. या समस्या एकदाच नव्हे, तर सातत्याने घडत असल्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघेही त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
https://prahaar.in/2026/05/13/the-fan-directly-reached-the-stage-sonu-nigam-handled-the-situation-with-patience/
या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत लॉकडाऊन काळात नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च झाला, मग नाट्यगृहाची अवस्था अजूनही अशी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता कल्याणमधील राजकारणही तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
https://prahaar.in/2026/05/13/shocking-incident-minor-boy-kills-nephew-following-argument-during-ludo-match-in-kalyan/
‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक आणि त्यातील ‘चिंची चेटकीण’ हे पात्र लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. मात्र आपल्या आवडत्या नाटकाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या खराब अवस्थेचा सामना करावा लागत असल्याने नाराजी वाढत आहे. कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहातील वास्तव समोर आणत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे कलाकारांचा संयम अखेर संपल्याचे दिसून येत आहे.