मुंबई : आखाती देशतील युद्धजन्य स्थितीमुळे जगभरातील अनेक देशात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. आपल्या शेजारच्या देशांत पेट्रोल ४५० रूपये लिटर झाले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला या गोष्टींचा योग्य पुरवठा होत आहे. आपल्याला गॅस, तेल या सर्व गोष्टी मिळत आहेत. पण, हे संकट समजून घेत या साधनांचा योग्य वापर केला नाही तर आपल्याला तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच पंतप्रधानांनी आवाहन केले असून जनता त्याला योग्य प्रतिसाद देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर, राहुल गांधी यांची समजच कमी असल्याचा पलटवार त्यांच्या टीकेवर केला.
https://prahaar.in/2026/05/11/west-asia-crisis-government-meeting-rajnath-singh-fuel-supply/
आखाती देशातील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेलाची काटकसर करतानाच वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यावर विरोधकांनी टीकेचा सूर लावल आहे. तर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र पंतप्रधानांचे आवाहन योग्यच असल्याचे सांगत देशवासियांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आधी नागपूर आणि त्यानंतर राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आखाती देशातील युद्धजन्य स्थितीमुळे जगभरात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. आपल्या आजुबाजुच्या देशांमध्ये या गोष्टींची किंमत खूप वाढली आहे. अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन सुरू झाले आहे. पाकिस्तानात ४५० रूपये लिटरने पेट्रोल विकले जात आहे. अनेक देशात पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे पेट्रोल – डिझेल आणि गॅस या गोष्टींचा आपल्याला योग्य पुरवठा सुरू आहे. पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. आपल्याला गॅस, तेल या सर्व गोष्टी मिळत आहेत. पण, आपण या संकटाला समजून घेतले नाही आणि याचा वापर योग्य रीतीने केला नाही तर आपल्यालाही तुटवड्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे पंतप्रधानांनी जे सांगितले आहे ते महत्वाचे आहे. मोदींनी म्हटले आहे की, या गोष्टींचा अमर्याद वापर करता येणार नाही. पुरवठा साखळीची परिस्थिती पाहता आणि परकीय चलन आपल्याला कसे वाचविता येईल या करिता मोदी यांनी केलेले आवाहन योग्य आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा हीच आमची भूमिका आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितले त्याचा अर्थ जर राहुल गांधी यांना कळला नाही, तर त्याचा दोष त्यांना देता येणार नाही. कुठेतरी समजच कमी आहे. देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता, रिजेक्टेड माल म्हणून अख्ख्या देशाने त्यांना नाकारले आहे. त्यांना माध्यमातलेच काही लोक महत्व देतात आम्ही देत नाही. मोदींच्या आवाहनाचा अर्थ जनतेला अर्थ कळला असून जनता योग्य प्रतिसाद देईल. तर, काँग्रेसची अवस्था अशी आहे की, त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या पक्षातले कोणी मानत नाही. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेऊ शकत नाही, राज्यातल्या नेतृत्वाला सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. हाच प्रकार आधी कर्नाटकात आपण पाहिल आहे आणि आता तसेच केरळमध्ये होणार आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
View this post on Instagram