जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. प्रखर उन्हामुळे झाडे करपत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावल तालुक्यातील हा परिसर तालुक्यातील बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेषतः केळी शेतीवर येथील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे केळी बागांचे संरक्षण करणे आव्हानात्मक बनले आहे. पाण्याची कमतरता आणि योग्य वेळी सिंचन न झाल्याने झाडांची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.
https://prahaar.in/2026/05/05/after-the-formation-of-bjp-governments-in-odisha-2024-and-delhi-2025-the-ayushman-bharat-scheme-has-been-implemented-there-now-preparations-for-implementing-this-scheme-in-west-bengal-are-in-t/
https://prahaar.in/2026/05/05/palash-muchhal-composer-palash-muchhal-in-trouble-threat-with-smriti-and-now-another-new-case-has-come-to-light/
दरम्यान, बाजारात केळीच्या भावात वाढ झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून केळी कमी दरात खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसून आर्थिक अडचणी अधिकच वाढत आहेत. या सर्व समस्यांमध्ये भर म्हणजे वीज पुरवठ्याचे विस्कळीत वेळापत्रक. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास दिली जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री २.३० ते सकाळी १०.३० आणि दिवसा १०.३० ते सायंकाळी ५.३० अशा वेळेत वीज पुरवठा केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना रात्री जागून शेतीची कामे करावी लागत असून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, वीज पुरवठ्याच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.