नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू (H5N1) चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास १ लाख ९३ हजारांहून अधिक कोंबड्या, ८ लाखांपेक्षा जास्त अंडी आणि सुमारे २१ टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला. मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता त्यात बर्ड फ्ल्यू विषाणूची (H5N1) पुष्टी झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवत बाधित क्षेत्रात कत्तल मोहीम सुरू केली.
https://prahaar.in/2026/05/05/chief-ministers-medical-fund/
या मोहिमेदरम्यान विविध पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. चौथ्या दिवशी मुजतबा आणि परवेज पोल्ट्री फार्ममध्येच ५६ हजारांहून अधिक पक्ष्यांचा नाश करण्यात आला.
नवापूर हा भाग कुक्कुटपालन व्यवसायासाठी ओळखला जातो. मात्र या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/05/palash-muchhal-composer-palash-muchhal-in-trouble-threat-with-smriti-and-now-another-new-case-has-come-to-light/
प्रशासनाने बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून पोल्ट्री उत्पादनांची वाहतूक व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ५० कर्मचारी आणि विशेष पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहेत.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.