Home ब्रेकिंग न्यूज Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!

Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!

0
Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!
cm speech on nari shakti in mumbai

वरळीतील ‘जन आक्रोश’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

मुंबई : “महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला संविधानविरोधी आणि महिलाविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. हे विधेयक केवळ तांत्रिक कारणास्तव थांबले असले, तरी महिलांची ही लढाई आता थांबणार नाही. ज्या दिवशी संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला लोकप्रतिनिधी म्हणून बसतील, त्याच दिवशी हा लढा यशस्वी झाला असे आम्ही मानू,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिला.

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे वरळी येथे भव्य ‘जन आक्रोश महिला संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात हजारो महिलांनी सहभाग नोंदवून राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, मात्र काँग्रेसची नीती नेहमीच अडवणुकीची राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन हे विधेयक आणले, पण आपली राजकीय दुकानदारी बंद होईल या भीतीने विरोधकांनी त्याला खो घातला. आता गप्प बसून चालणार नाही. ज्यांना नारीशक्तीचे वावडे आहे, त्यांची झोप उडवण्यासाठी राज्यातील एक कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवली जाईल. या सह्यांचे निवेदन राहुल गांधी आणि आघाडीच्या नेत्यांना पाठवून महिलांचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल.”

‘विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला’

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. “भाषणामध्ये महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की पळ काढायचा, ही विरोधकांची जुनी खोड आहे. या विधेयकाला विरोध करून त्यांनी केवळ कागदावरच्या तरतुदीला नव्हे, तर कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर महिलांचा खऱ्या अर्थाने विचार मोदीजींनी केला, मग विरोधकांच्या पोटात का दुखले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.