Home ब्रेकिंग न्यूज Transport Minister Pratap Sarnaik’s announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर

Transport Minister Pratap Sarnaik’s announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर

Transport Minister Pratap Sarnaik’s announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर
Thane Metro

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) वाहतूक कोंडीचा विळखा सैल करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांना वेग दिला असून, रखडलेला ‘मेट्रो १०’ चा मार्ग येत्या ३ ते ४ महिन्यांत प्रवाशांसाठी खुला होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केली. यासोबतच घोडबंदर रस्ता रुंदीकरण आणि अत्याधुनिक ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाबाबत त्यांनी सरकारचा आराखडा मांडला.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरनाईक बोलत होते. यावेळी त्यांनी ठाणे आणि मिरा-भाईंदर पट्ट्यातील वाहतूक सुलभ करण्यासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या विशेष नियोजनाची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच काशिगाव ते दहिसर मेट्रोचे लोकार्पण झाले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार काशिगाव ते गायमुख हा मार्ग थेट ‘मेट्रो ४’ (वडाळा-कासारवडवली) ला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण ८ हजार कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या नवीन मेट्रो जोडणीमुळे मिरा-भाईंदरकरांना ठाणे आणि मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

आता ठाणे, नवी मुंबईतही ‘पॉड टॅक्सी’

मुंबईच्या धर्तीवर आता ठाणे आणि नवी मुंबईतही ‘पॉड टॅक्सी’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एमएमआरडीएने स्थानिक महापालिकांशी समन्वय साधून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर निविदा काढण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

घोडबंदर रोडचा अडथळा दूर

घोडबंदर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे रुंदीकरण पूर्ण केले जाणार आहे. “रस्त्यातील विद्युत खांब आणि मेट्रो कामांमधील तांत्रिक अडथळे आता दूर झाले आहेत. गायमुख ते दहिसर रस्ता रुंदीकरणात ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील, त्यांना एफएसआय किंवा टीडीआरच्या स्वरूपात मोबदला दिला जाईल. विशेषतः आदिवासी बांधवांच्या जमिनींबाबत संवेदनशील निर्णय घेऊन त्यांना न्याय दिला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.