मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले तसेच नियमानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 1, 2026
एका कंत्राटी कामावर मजुरी करत असलेल्या महिला पिकअपमध्ये बसल्या होत्या आणि पुढील प्रवासाला निघणार होत्या. या उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना समृद्धी महामार्गावर जालना परिसरात जामवाडी शिवारात घडली. पिकअपला धडक देणारा ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता. ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअपमधील काही महिला धक्क्याने बाहेर फेकल्या गेल्या आणि ट्रकखाली चिरडल्या गेल्या. मृतदेह रस्त्यावर इतस्ततः पडले होते. जेवणाचे डबे, चपला इत्यादी साहित्य विखुरले होते. ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा झाला. अपघातात मृत्यू झालेल्या सर्व महिला या बदनापूरमधील केळीगव्हाण गावच्या आहेत.