Home ब्रेकिंग न्यूज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

0
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटीची) महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील 68 सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन एससीईआरटीला गौरविण्यात आले असून परिषदेच्या वतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.

एआय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन : एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून शिक्षक व प्रशासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रातही परिषदेने लक्षणीय प्रगती केली असून एकूण 152 पैकी 135.5 गुण मिळवत उच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-ऑफिस प्रणालीत 100 टक्के अंमलबजावणी करत 96.94 टक्के फाइल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सर्व 92 कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले आहे.

चॅटबॉटच्या माध्यमातून शंकांचे निराकरण : नागरिकाभिमुख सेवांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचा प्रभावी वापर करण्यात आला असून नागरिकांच्या शंकांचे स्वयंचलित निराकरण, योजनांची माहिती आणि अलर्ट्स देण्यात येत आहेत. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सेवा उपलब्ध असल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तंत्रज्ञान आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग : डॅशबोर्ड प्रणालीद्वारे डेटा व्हिज्युअलायझेशन आणि नियमित अपडेट्समुळे जिल्हास्तरापर्यंत निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. डिजिटल हजेरी आणि इतर उपक्रमांचे रिअल-टाइम मॉनिटरिंगही प्रभावीपणे केले जात आहे. तसेच जीआयएस तंत्रज्ञानाच्या वापरातून राज्य ते शाळा स्तरापर्यंत हीटमॅप्सद्वारे उपस्थिती व अध्ययन कामगिरीचे विश्लेषण करण्यात येत आहे. यामुळे जोखीम ओळख, तफावत विश्लेषण आणि लक्ष्यित नियोजन अधिक परिणामकारक ठरत आहे.

तक्रार निवारणाचा दर 97 टक्के : तांत्रिकदृष्ट्या एससीईआरटीची वेबसाइट 100 टक्के सुरक्षित, प्रमाणित आणि मोबाइल सुसंगत असून दररोज एक हजाराहून अधिक वापरकर्ते या वेबसाइटला भेट देत आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत आवश्यक माहितीचे प्रकटीकरणही पारदर्शकपणे करण्यात आले आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत 10 पैकी 9.7 इतका चांगला समाधान दर नोंदवला गेला आहे.

एकूणच, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीआयएस आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून एससीईआरटीने शिक्षण क्षेत्रात आधुनिक, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. परिषदेने सुरू केलेले हे कार्य यापुढे अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास विद्यमान संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.