Home देश भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

0
भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर फास आवळला आहे. कोणत्या देशाचे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जावे यावर इराणचे कठोर नियंत्रण आहे. इराणचे हे नियंत्रण अद्याप तसूभरही कमी झालेले नाही. इराणच्या या सामर्थ्यावर हल्ला करण्याचे अमेरिका आणि इस्रायलचे प्रयत्न अद्याप अपेक्षित यश मिळवू शकलेले नाही.

युद्धामुळे भारताला होर्मुझमार्गे होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला होता. पण भारत आणि इराण यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यानंतर इराणने भारताला तेल आणि गॅसचा पुरवठा करणाऱ्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली. सध्या या परवानगीमुळे होर्मुझमधून भारताला होणाऱ्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्याला कोणतीही अडचण नाही. पण भविष्यात युद्धमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होर्मुझमधील परिस्थिती बिघडली तर भारताचे ऊर्जोस्रोत संकटात सापडू नये यासाठी भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला पर्याय असा सुरक्षित सागरी मार्ग शोधला असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या पश्चिम आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिकमधील तेलाकडे वळत आहेत. भारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियमने एका निविदेद्वारे अंगोलाकडून २० लाख बॅरल तेल खरेदी केले आहे. भारत आधी तेल आणि गॅससाठी आखाती देशांवर ४५ टक्के अवलंबून होता. पण पर्याय सापडल्यामुळे आता भारताचे होर्मुझवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार एचपीसीएलने एक्सॉनकडून दहा लाक बॅरल तेलाची खरेदी केली आहे. तसेच इंडियन ऑइल ही कंपनी पश्चिम आफ्रिकेतून तेलाची खरेदी करण्यासाठी काही प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. यामुळे मे महिन्यापासून भारताचे होर्मुझवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होणार आहे.