Home ब्रेकिंग न्यूज औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

0
औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत, यासाठी नामांकीत प्रशिक्षण संस्थाचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सारथी संस्थेच्या संचालकांची तसेच शासनाच्या संबंधित विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीसाठी सारथी संस्थेचे संचालक श्री.मधुकर कोकाटे, श्री.उमाकांत दांगट, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे व इतर अधिकारी उपस्थित होते. उपसमितीचे अध्यक्षपद स्विकारल्यापासून संपन्न झालेली आजची ही नववी बैठक होती. सारथी संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना उपक्रमांचा सविस्तर आढावा सारथी संस्थेला उपलब्ध होत असलेला निधी याचा सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी सदर बैठकीमध्ये घेतला. सारथी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे यांनी सादर केली.

बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, समाजातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण उपक्रम सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. सारथी संस्थेने यामध्ये पुढाकार घेतल्यास समाजातील युवक- युवतींना त्याची मोठी मदत होईल. सद्यपरिस्थितीत औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ या कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध होवू शकते यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविण्याच्या दृष्टीने सारथी संस्थेने प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

सारथी संस्थेचे उपक्रम योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकत ते सर्व पाठबळ देण्याबाबत त्यांनी सारथी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासीत केले.राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने पुर्व प्रशिक्षणा करीता युपीएसी करीता शंभर जागावरून चारशे तर एमपीएसी करीता ४००जागांवरून १हजार जागा निर्माण करण्यास मान्यता दिली असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिली.

राज्य सरकारने सन २०२५-२६ आर्थिक वर्षात ५१५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी ४४२ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून, पुरवणी मागण्यां मध्येही ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे विखे पाटील म्हणाले. सारथी संस्थेमार्फत राज्यात एकूण आठ वसतीगृह उभारण्यात येत असून, यापैकी सहा वसतीगृहांचे काम पूर्ण होत आहेत. या वसतीगृहांमध्ये सहा हजार विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. या वसतीगृहांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन द्यावीत तसेच वसतीगृहांचे व्यवस्थापन नामांकित संस्थां कडून करण्याच्या सूचना डॉ.विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

सारथी संस्थेमार्फत सन २०२५-२६ मध्ये एकूण ३४ प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. यासाठी ४८हजार ३८१ मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील लक्षीत गटाला एकूण २२२ कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच स्पर्धा परिक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण ११७९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले आहे. तसेच १६४ देशांतर्गत शिष्यवृत्तीधारक, कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षीत झालेल्या १०२०९ अशा एकूण ११हजार ९१५ प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.