जम्मू आणि काश्मीर: पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १५ दिवसांपूर्वी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय महिलांच्या कपाळावरून पुसलेल्या सिंदूरचा बदला भारताने घेण्यास सुरुवात केली आहे. ७ मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. संपूर्ण पाकिस्तानचे लक्ष भारतात विविध ठिकाणी होणाऱ्या मॉक ड्रिलकडे असतानाच भारताने चढवलेला हमला पाकड्यांची भंबेरी उडवणारा ठरला.
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत, या ठिकाणी भारताने चढवले हल्ले
यामध्ये दहशतवाद्याचा म्होरक्या हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणांचा देखील समावेश आहे. आतापर्यंतच्या अपडेट्सनुसार, भारताने मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगढ येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेल्या या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नामशेष झाल्या आहेत. यासह सैन्याने न्याय झाला असे जाहीर करत, या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे म्हंटले.
भारताने कुठे कारवाई केली?
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घातल्या होत्या. हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर ६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी लपलेले आहेत त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.