मुंबई : वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून (Contingency Reserve) पाणी उपलब्ध करून दिले आहे. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. येत्या ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे,हवामान खात्याशी समन्वय साधून पावसासंबंधी अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात ५ मे २०२५ रोजी उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सोमवारी ५ मे २०२५ रोजी सकाळपर्यंतची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणा-या जलाशयांमध्ये मिळून एकूण २२.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र शासनानेदेखील महानगरपालिकेस भातसा धरण आणि अप्पर वैतरणा धरणातून निभावणी साठ्यातून (Contingency Reserve) अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीकपातीची कोणतीही आवश्यकता नाही.
धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे.त्याचबरोबर, पावसाच्या आगमनाबाबत हवामान खात्यासमवेत समन्वय साधून महानगरपालिका प्रशासनामार्फत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
असे असले तरीही मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.