महाराष्ट्र दिनी हेमंत ढोमेचे वादग्रस्त विधान
मुंबई : मराठी शाळा एकामागोमाग बंद पडतायत, तर मराठी भाषा कशी जगणार? असा थेट सवाल अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनी उपस्थित करत वादळ उठवलं आहे.
मराठी संस्कृतीचा अभिमान व्यक्त करताना, ढोमे यांनी शिक्षणव्यवस्थेवर आणि शासनाच्या उदासीन धोरणांवर निशाणा साधला. “इंग्रजी शाळांच्या मागे धावताना आपण आपल्या मुळांपासून दूर जात आहोत,” असं त्यांनी ठासून सांगितलं.
त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून काहींनी त्यांचं समर्थन केलं, तर काहींनी टीका. महाराष्ट्र दिनासारख्या दिवशी ही भावना मांडून ढोमे यांनी मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आवाज उठवला आहे, पण शासन आणि समाज यावर कृती करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
एकेकाळी गावागावात चालणाऱ्या मराठी शाळा आज ओस पडत आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे, तर दुसरीकडे इंग्रजी शाळांचा झगमगाट वाढतोय. गेल्या काही वर्षांपासून या विषयावर चर्चा-वाद झडत असले तरी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. धोरणांच्या अभावामुळे आणि पालकांमध्ये असलेल्या ‘इंग्रजी मोहामुळे’ मराठी माध्यमाच्या शाळा एकामागोमाग एक बंद होताना दिसत आहेत.
https://prahaar.in/2025/05/01/pakistani-celebrities-instagram-accounts-suspended-in-india/
याच गंभीर विषयावर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फक्त भावनिक नसून समाजाला जागं करणारा असणार आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्षिती जोगच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा असणार आहे तर आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॅाडक्शन सोबत त्यांचा सलग तिसरा चित्रपट असणार आहे.
मराठी शाळांमधील शिक्षणपद्धती, मातृभाषेत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट मनोरंजन करताना विचार करायला लावणारा ठरेल. शिक्षण क्षेत्रातील बदल, मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेच्या माध्यमातून होणाऱ्या जडणघडणीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.
हेमंत ढोमे याने याआधी ‘झिम्मा’, झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे संवेदनशील विषय मनोरंजनाच्या माध्यमातुन मांडले होते. आता ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा एक वेगळा सामाजिक विषय तो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, “मराठी माध्यमातून मिळालेलं शिक्षण हे माझं बळ ठरलं, अडथळा नाही. मातृभाषेत शिकल्यामुळे मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली आणि याच जडणघडणीचा अभिमान मी जगभर मिरवू शकलो. आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं!आज मी जो काही आहे, तो माझ्या मराठी शाळांमुळेच आहे.
काय म्हणाला हेमंत ढोमे?
माझे शालेय शिक्षण हे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण आठ मराठी शाळांमधून झाल. ज्यात जिल्हा परिषद शाळा देखील होत्या ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. परंतू आजकाल मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांची पट संख्या खालावत आहे ही चिंतेची बाब असून या चित्रपटातून मातृभाषेतील शिक्षण हे कमीपणाचं नसून, खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं असतं हे अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”