Thursday, May 8, 2025
Homeदेश'कोणालाही सोडणार नाही, शोधून काढणार आणि वेचून मारणार'

‘कोणालाही सोडणार नाही, शोधून काढणार आणि वेचून मारणार’

नवी दिल्ली : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना वाटत असेल की ते जिंकले तर तो त्यांचा भ्रम आहे. त्यांना शोधून काढून आणि वेचून मारू. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे. एक – एक करुन बदला घेतला जाईल; असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते दिल्लीत एका सार्वजनिक सभेत बोलत होते. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादी आणि त्यांना मदत देणाऱ्या पाकिस्तानला सज्जड दम दिला.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, मग ते ईशान्य भारत असो, डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचा प्रदेश असो किंवा काश्मीरमधील दहशतवाद असो आम्ही प्रत्येकाला प्रत्युत्तर देत आहोत. जर कोणाला वाटत असेल की हल्ला केला आणि ते जिंकले तर तो त्यांचा भ्रम आहे. त्यांना शोधून काढून आणि वेचून मारू. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे. एक – एक करुन बदला घेतला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही; असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरू राहील. ज्यांनी पहलगाममध्ये नागरिकांची हत्या केली त्यांना शिक्षा होईल. परिणाम भोगावेच लागतील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. काश्मीरमध्ये ९० च्या दशकापासून दहशतवाद आहे. पण मोदी सरकार दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत आहे. नागरिकांचे प्राण घेणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील. दहशतवादाविरुद्धची लढाई म्हणजे मोठ्या प्रवासातील एक टप्पा आहे. प्रत्येकाला योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल; असे अमित शाह यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून दहशतवादाचा बीमोड केला जाईल, असेही अमित शाह म्हणाले.

दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांचा पाठिंबा मिळत असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे आहे. दहशतवादाला तोंड देण्यासाठी जगातील अनेक देश एकत्र येत असून ते भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत आहेत; असे अमित शाह म्हणाले.

याआधी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केंद्राकडून तातडीने अमित शाह जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले होते. त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहताना दहशतवाद्यांना धडा शिकविणार असल्याचे जाहीर केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -