नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या तणावपूर्ण वातावरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केला आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी आज (दि ३०) बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य काही सदस्यही सहभागी झाले होते.
पंतप्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती (CCS) बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सीसीएस बैठकीसह, पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) यांच्या बैठका बोलावण्यात आल्या. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा मंडळात बदल करण्यात आले. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारत तयारी करत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा मंडळात आणखी ७ सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी पश्चिम हवाई कमांडर एअर मार्शल पी. एम. सिन्हा, माजी दक्षिण लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आणि रिअर अॅडमिरल माँटी खन्ना या लष्करी सेवांमधून निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलीस सेवेतून (IPS) निवृत्त झालेले दोन सदस्य आहेत. सात सदस्यीय मंडळात बी. व्यंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस (IFS) अधिकारी आहेत.