क्रिकेट हा केवळ खेळ नाही तो आहे विक्रमांचा उत्सव! पण काही विक्रम हे काळाच्या चौकटीत बसत नाहीत… ते इतिहास घडवतात. आणि यंदाच्या आयपीएल मध्ये, असाच इतिहास रचला आहे अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने… कोण आहे हा वैभव… चला जाणून घेऊ या सविस्तर माहिती…
बिहारच्या पाटण्यातून आलेला हा चिमुकला राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील होतो आणि आपल्या तिस-याच सामन्यात ३५ चेंडूत शतक ठोकून क्रिकेटविश्व हादरवतो… ७ चौकार… ११ षटकार… आणि अवघ्या १४ वर्षांत ही कामगिरी… असं काही फक्त प्रतिभाच नाही, तर जिद्द, मेहनत आणि नैसर्गिक खेळातील कसब याच्या जोरावरच शक्य होतं. वैभवच्या या यशामागे आहे संघर्षांची दीर्घ कहाणी. त्याच्या वडिलांनी मुलाच्या स्वप्नासाठी आपली जमीन विकली… पाचव्या वर्षी क्रिकेट हातात घेतलेला वैभव… अकादमीमध्ये इतर मुलं जिथं १५० चेंडू खेळायची, तिथं हा मुलगा ६०० बॉल्स खेळायचा.
१२ व्या वर्षी विनू मंकड ट्रॉफीमध्ये ४०० धावा, अंडर १९ सामन्यात त्रिशतक, विजय हजारे, आशिया कप, रणजी सगळीकडे त्याचा दबदबा. आणि या सा-या प्रवासात त्याला दिशा दिली भारताचा व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाज लक्ष्मण आणि द वॉल राहुल द्रविड यांनी. द्रविड आणि लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळाला दिशा मिळाली…
आयपीएलपूर्वी लक्ष्मणने त्याची द्रविडकडे शिफारस केली आणि राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १ कोटी १० लाखांना खरेदी केलं.. त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवणारे आईवडील, लक्ष्मण सर आणि द्रविड सर हे खरे पारखी ठरले. आज त्याची तुलना सचिनशी होते, पण तो अजून प्रवासाच्या सुरुवातीला आहे. पुढं अनेक कसोट्या आहेत, संधी आहेत… पण सातत्य, संयम आणि जमिनीवर राहण्याची शिस्त हीच त्याची खरी कसोटी ठरणार आहे.
१४ वर्षांचा हा मुलगा आज क्रिकेटच्या व्यासपीठावर चमकतोय, कारण त्याने आपल्या मेहनतीचा दिवा विझू दिला नाही… आणि त्याच्या झळाळत्या खेळाला द्रविड-लक्ष्मणसारखे रत्नपारखी लाभले. विक्रमी खेळी आली आणि गेली, पण वैभवची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. तो खेळात टिकेल की नाही, हे येणारा काळ सांगेल… पण आज मात्र, आपल्याला हे नक्की सांगता येईल, क्रिकेटच्या आकाशात एक नवा तारा उगम पावलाय. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी!