नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी एकूण चार अतिरिक्त उड्डाणे चालवतील. मंगळवारी दुपारी काश्मीरमधील पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) किमान २८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, एअर इंडिया आणि इंडिगो द्वारे श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त उड्डाणे चालवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, तिकीट रद्द करण्यासाठी किंवा प्रवासाची तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे तिथे अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, एअर इंडियाने पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांची घोषणा केली आहे. “सध्याची परिस्थिती पाहता, एअर इंडिया बुधवार, २३ एप्रिल रोजी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवेल,” असे एअर इंडियाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
याशिवाय, इंडिगोच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ते बुधवारी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवतील.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहलगाममधील दुर्दैवी घटनेबाबत नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांच्याशी चर्चा केली, जिथे महाराष्ट्रातील पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. शिंदे यांच्या कार्यालयानुसार, त्यांनी नायडू यांना मृतांचे पार्थिव श्रीनगरहून मुंबईला त्वरित नेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून, नायडू यांनी आश्वासन दिले आहे की सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील आणि मृतदेह लवकरात लवकर परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे शिंदे यांच्या कार्यालयाने सांगितले.
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतली आणि श्रीनगर मार्गावर अचानक भाडेवाढ करण्याविरुद्ध कडक सूचना जारी केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांनी समान भाडे पातळी राखावी याचीही त्यांनी खात्री केली. केंद्रीय मंत्र्यांनी विमान कंपन्यांना मृतांचे मृतदेह त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…