वाडा : तालुक्यात ७० टायर कंपन्यांनी आपले जाळे पसरवले आहे. बहुसंख्य कंपन्या या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे उघड झाले आहे. यातील ५२ टायर कंपन्या दिवस-रात्र काळाकुट्ट प्रदूषणकारी धूर ओकत आहेत. त्यांच्या त्रासाने येथील नागरिकांना शोषणाचे आजार जडू लागल्याने ग्रामस्थ कासावीस झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित केल्याने त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने अखेर वाड्यातील १८ टायर कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केल्या आहेत. तरीसुद्धा सध्या वाडा तालुक्यात ५२ टायर कंपन्या सुरू असून या कंपन्यांमध्ये जुने टायर जाणून त्यापासून ऑइल, तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या कारखान्यातील सांडपाणी हे येथील नाल्यात सोडले जात असल्याने मासे व जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत. शिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा बघितली जात नसल्याने या कंपन्यांमध्ये बॉयलरच्या स्फोटात वारंवार कामगार मृत्युमुखी पडत आहेत.
Electricity Bill Center : सुट्टीच्या दिवशीही वीजबिल केंद्र सुरू राहणार!
तालुक्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेची व्यवस्था नाही, फॅक्टरी लायसन्स कंपन्यांकडे नाहीत, वनविभागाची परवानगी ही नाही, नगर रचना विभागाकडून बांधकामाची सनद ही घेतलेली नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत दाखल्यावरच हे कारखाने उभे असल्याचे माहिती अधिकाराखाली उघड झाले असल्याचे ग्रामस्थ कल्पेश पाटील त्यांनी बोलताना सांगितले.