मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक नियम बदलतात. (New Bank Rules From 1st April 2025) काही आपल्या फायद्याचे, तर काही थोडे गैरसोयीचे. पण एप्रिल महिना म्हणजे आर्थिक वर्षाची सुरुवात! त्यामुळे यावेळी होणारे बदल अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. (New Banking Rules In India) यूपीआय पेमेंटसंबंधी नवीन नियम लागू होणार आहेत, बँक खात्यातील मिनिमम बॅलन्स बदलणार आहे, एटीएममधून पैसे काढणं महाग होणार का, पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे नक्की काय, आरबीआयने (Reserve Bank of India) कोणता नवीन निर्णय घेतलाय. एक एप्रिल पासून नेमके असे कोणते मोठे बदल होणार आहेत. या सगळ्या बदलांविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
आजकाल पाच रुपयांचं बसभाडं द्यायचं असो किंवा हजारोंची खरेदी करायची असो, पेमेंटच्या वेळी आपला हात थेट मोबाईलकडे जातो आणि एका क्लिकवर यूपीआय ॲप्सद्वारे पेमेंट केलं जातं. पण जर तुमच्या यूपीआय अकाउंटला इनॲक्टिव्ह मोबाईल नंबर जोडलेला असेल, तर १ एप्रिलपासून तुम्हाला पेमेंट करण्यास अडचण येऊ शकते.
जर तुम्ही तुमच्या सिम कार्डचा ९० दिवसांपेक्षा जास्त काळ रिचार्ज केला नसेल, तर टेलिकॉम कंपन्या तो नंबर बंद करून दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात. पण जर हा बंद झालेला नंबर यूपीआय अकाउंटशी लिंक असेल, तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँकांना आदेश दिले आहेत की ३१ मार्चपूर्वी अशा नंबरशी जोडलेली यूपीआय खाती डिऍक्टिव्ह करावीत. त्यामुळे तुमचा यूपीआय नंबर सक्रिय आहे का, हे तपासणं आता आवश्यक आहे. यूपीआय सेवा बंद होऊ नये यासाठी युजर्सना आता कायम त्यांचा यूपीआय किंवा बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आणि अप टू डेट ठेवावा लागणार आहे.
१ एप्रिलपासून काही मोठ्या बँका त्यांच्या मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये बदल करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या बँकांनी त्यांच्या खात्यांमध्ये ठेवाव्या लागणाऱ्या किमान शिल्लक रकमेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी आणि निमशहरी भागांमध्ये बॅलन्सच्या मर्यादा वेगळ्या असतील आणि जर खात्यात ठराविक शिल्लक नसेल, तर दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यातील शिल्लक तपासून आवश्यक ती रक्कम कायम ठेवणं गरजेचं आहे.
बँकिंग क्षेत्रात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. बँका डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करत आहेत. को-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या मदतीने यूपीआय आणि इतर ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित केले जातील. बँका एआय चॅटबॉट्सचा वापर करून ग्राहकांच्या समस्या सोडवणार आहेत. पण यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावं लागणारं काम कमी होईल का, की नव्या प्रणालींमुळे आणखी अडचणी निर्माण होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
१ एप्रिलपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाणार आहे. जर तुम्ही पाच हजार किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेचा चेक भरत असाल, तर त्या चेकच्या डिटेल्स आधीच बँकेला कळवाव्या लागतील. चेक नंबर, तारीख, रक्कम आणि लाभार्थ्याचं नाव बँकेकडे नोंदवणं बंधनकारक असेल. या प्रक्रियेमुळे चेक बाउन्स होणं, फसवणुकीचे प्रकार आणि व्यवहारातील चुका टाळता येतील. जरी हा बदल थोडा वेळखाऊ वाटत असला, तरी व्यवहार अधिक सुरक्षित होतील.
यूपीआय आणि डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि रोख व्यवहार कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेवेसाठी आकारली जाणारी रक्कम. जर तुम्ही तुमच्या बँकेशिवाय इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले, तर ठरावीक संख्येनंतर तुम्हाला या वाढलेल्या चार्जेसचा फटका बसू शकतो. आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपये केली जाणार आहे, तर गैरआर्थिक व्यवहारांसाठी ती ६ रुपयांवरून ७ रुपये केली जाईल. हा बदल १ मेपासून लागू होणार असला, तरी त्याचा सर्वसामान्य ग्राहकांवर किती परिणाम होईल, हे पाहणं गरजेचं आहे.
अनेक बँका बचत खाती आणि मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करत आहेत. बचत खात्यावरील व्याज आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल, म्हणजेच जास्त शिल्लक रकमेवर चांगले दर मिळू शकतात. या समायोजनांचा उद्देश स्पर्धात्मक परतावा देणे आणि बचतीला प्रोत्साहन देणे आहे.
एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह प्रमुख बँका त्यांच्या सह-ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्डमध्ये बदल करत आहेत. तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्ससारखे फायदे बंद केले जातील. अॅक्सिस बँक १८ एप्रिलपासून अशाच प्रकारचे बदल लागू करेल, ज्यामुळे त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डधारकांवर परिणाम होईल.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…