‘ती’चा क्षितिजापार प्रवास पण…

Share

डॉ. दर्शना प्रशांत कोलते

८०-८५ वर्षांपूर्वी कोकणातील एका छोट्याशा खेड्यातल्या दोन अशिक्षित विधवा बायका, एकमेकींच्या जावा-जावा, दोघींच्या मिळून पाच मुलांना हिंमतीने वाढवतात, शिकवतात… नवऱ्याच्या पश्चात असलेल्या जमिनी, झाडंपेडं आणि स्वाभिमान यातलं काहीही न विकता कष्टाने संसार उभा करतात… मला कायम अभिमानास्पद वाटत आलेली माझ्या आजीची आणि चुलत आजीची ही गोष्ट… स्त्री सक्षमीकरण याहून वेगळे काय असते…? आज महिला दिनानिमित्त आपण स्त्रीच्या सबलीकरणाबद्दल बोलत राहतो. मोठमोठ्या कर्तबगार, प्रसिद्ध स्त्रियांचे दाखले देत राहतो पण ही डोळ्यांसमोरची उदाहरणे… यांच्याकडे दुर्लक्षच होते आपले! सासुसासऱ्यांनी केलेला छळ सहनशक्तीपलीकडे गेला, तेव्हा एक दिवस त्यांच्यासमोर कुऱ्हाड घेऊन दुर्गेच्या रूपात उभी राहिलेली माझी मावशी! त्यानंतर मात्र त्या घरात तिला छळण्याची कुणी हिंमत केली नाही. दारूड्या नवऱ्याला झेलत संसाराचा गाडा एकटीने ओढणाऱ्या आणि मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या कष्टकरी महिला तर आपल्या आजूबाजूला कितीतरी पाहतो आपण! त्यांना स्त्रीमुक्ती, स्त्रीशक्ती, समानता, सबलीकरण हे शब्द माहीत नसतात, पण त्या जे जगत असतात ते याहून वेगळे काही नाहीच!

नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात आदरणीय तारा भवाळकर म्हणाल्या तसं रूढार्थाने बायका शिक्षित फार उशिरा झाल्या असतील पण त्या अशिक्षित होत्या म्हणजे अडाणी होत्या असं नव्हे, उलट एक व्यवहारी शहाणपण त्यांच्यात होतं. साध्या भाषेत कॉमन सेन्स होता! पण याच पार्श्वभूमीवर जेव्हा आताची तरुणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाहतो तेव्हा मात्र सुशिक्षित असूनही सुजाण न झालेली तरुणी बरेचदा बऱ्याच ठिकाणी जाणवत राहते. आधीच्या पिढीतील समाजसुधारकांनी स्त्रीला शिक्षित करण्याचा अट्टहास याचसाठी केला होता का असेही वाटत राहते कधीकधी! अर्थात ही स्थिती सार्वत्रिक नसली तरी अगदी अपवादात्मकही नाही! मध्यंतरी वाचलेली एक बातमी… दारू पिणाऱ्या महिलांच्या संख्येत २.५ % वरून ५ % इतकी वाढ! म्हटले वा! याबाबतीत ही लवकरच महिला पुरुषांची बरोबरी करू शकतील यात शंका नाही! समानतेचा अर्थ बरेचदा स्त्रीने पुरुषासारखे वागणे असा उथळपणे घेतला जातो. स्त्री आणि पुरुष या विधात्याच्या दोन स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आहेत. एकाने दुसऱ्यासारखे बनण्याचा अट्टहास कशासाठी? समाज माध्यमे, प्रसार माध्यमे, सवंग मालिका, चित्रपट यातून हेच बिंबवले जाते की, पुरुषांसारखी वेशभूषा, केशभूषा करणारी आणि बेफिकीर असणारी स्त्री म्हणजे आधुनिक! वरवरच्या या वेष्टनामध्येच नवी उमलणारी पिढी इतकी गुरफटून गेलीय की आतला गाभा तसाच कच्चा राहिलाय हे पदोपदी जाणवते.

पण बेफिकीर किंवा परिणामांची पर्वा न करता वागल्यामुळे नंतर पश्चाताप कराव्या लागणाऱ्या मुलींना पाहिले की हळहळ वाटते. मुळात ते प्रेम नसून आकर्षण आहे हे न कळल्यानेच अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. भावनेच्या भरात आई-वडिलांना दूर लोटून आवडत्या जोडीदाराशी लग्न केले जाते. लग्नानंतर मुखवटे गळून पडतात आणि खरा चेहरा दिसू लागतो. मुलीला सासरच्यांसोबत जुळवून घ्यावे लागते. वर्ष व्हायच्या आत पदरात पोर असते, त्याला कसे सांभाळावे हे कळत नसते, कारण स्वतःला सावरायलाच वेळ मिळालेला नसतो… अशा पिचलेल्या, खचलेल्या तरुण सुशिक्षित मुली जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरंच वाटते हेच का महिला सबलीकरण? लग्नाआधीच्या प्रेमसंबंधातून राहणारी प्रेग्नन्सी हे आणखी एक उदाहरण!

आपण कितीही स्त्रीला पुरुषासारखे बनवण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गाने अजूनही मातृत्वाची देणगी स्त्रीलाच बहाल केलेली आहे. या देणगीचा शाप वाटू नये हीच अपेक्षा आहे. पेहरावाचे, वागण्या-बोलण्याचे, फिरण्याचे स्वातंत्र्य जसे मुलाला आहे तसे मुलीलाही असायलाच हवे. पण या स्वातंत्र्यामधून आपलीच सुरक्षितता धोक्यात येत नाही ना… याची खबरदारी मुलीलाच घ्यावी लागणार आहे. कारण अजून तरी बलात्कार पुरुषाकडून स्त्रीवरच केला जातो. तिथे समानता नाही! असुरक्षित सामाजिक वातावरण, बघ्याची भूमिका घेणारा समाज आणि पुरुषाची स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याची मानसिकता हे बदलायला हवेच आहे. पण हा बदल फार धीम्यागतीने होणारा आहे. तोपर्यंत स्त्रीला स्वतःलाच स्वतःचा पाठीराखा कृष्ण व्हावे लागणार आहे. कान आणि डोळे उघडे ठेवून, मेंदू जागृत ठेवून, भावनेच्या भरात वाहवत न जाता सबल, सक्षम, सजग होऊन समाजात वावरावे लागणार आहे!

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

42 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

1 hour ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago