रणसंग्रामाची घंटा वाजली, राज्याची सत्ता कुणाला ?

Share

राज्यात विधानसभेची निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा संपुष्टात आली. नवीन विधानसभेसाठी मतदान कधी होणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आणि येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार असून ९ कोटी ६३ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. कोण आमदार विधानसभेवर निवडून द्यायचा व राज्याच्या किल्ल्या कोणाच्या हाती द्यायच्या याचा निर्णय मतदारांनी करायचा आहे. देशात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा निकराचा राजकीय संघर्ष या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी परीक्षा आहे.

महायुतीचे सरकार वाट्टेल ते करून त्यांना पुन्हा सत्तेवर आणायचे आहे. महायुतीपुढे महाविकास आघाडीचे यावेळी जबर आव्हान आहे. ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांत मोठी फूट पडल्यानंतर ते दोन्ही पक्ष हतबल होतील, संपतील किंवा दुर्बल होतील असे भाजपाला वाटले होते. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाआघाडीला ४८ पैकी ३१ जागा दिल्या, तर महायुतीचे केवळ १७ खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त नुकसान भाजपाचे झाले, सन २०१९ मध्ये भाजपाचे २३ खासदार होते, यंदा केवळ ९ खासदार निवडून आले. पराभवाची कसर भरून काढणे व महाआघाडीपेक्षा जास्त आमदार निवडून आणणे हे भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांपुढे मोठे आव्हान आहे. म्हणूनच महायुतीपुढे शरद पवार, ठाकरे नि राहुल गांधी (नाना पटोले नि बाळासाहेब थोरात) असे जंगी आव्हान आहे. महिनाभरात महायुती सरकारने सवलती नि मोफत योजनांची समाजघटकांवर खैरात केली, त्याचा खराच किती लाभ होतो हे निकालानंतरच समजेल.

महाआघाडीच्या डावपेचांपुढे महायुतीला किंचितही गाफिल राहून चालणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, तसेच प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, लक्ष्मण हाके, मनोज जरांगे, बच्चू कडू आदी नेते किती मते खेचून घेतात, त्यावरही राजकीय समीकरण ठरणार आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती होती. तेव्हा भाजपाने १०५ व शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे ४४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले होते. पाच वर्षांत महाराष्ट्रात एवढ्या उलथापालथी झाल्या की, मतदार कमालीचे गोंधळले आहेत. आपण कोणाला कोणत्या पक्षाचे आमदार म्हणून निवडून देतो आणि कोणाच्या विरोधात निवडून देतो आणि नंतर हेच आमदार कुठे जातात, काय करतात हे पाहिल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाला आहे, अशी भावना मतदारांची झाली आहे. निवडून येण्यासाठी मतदारांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. निवडून दिल्यानंतर आमदार सत्ता आणि प्रलोभनाच्या मागे धावणारच नाही, याची आज शाश्वती राजकीय पक्षांना आणि मतदारांनाही वाटत नाही. पक्षांच्या फोडाफोडीवर सत्तेचे राजकारण किती वाईट पद्धतीने खेळले जाते याचा अनुभव महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षांत घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री बघितले. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस व अजित पवार ही जोडी बघितली, ती ८० तासच टिकली, नंतर उद्धव ठाकरे व अजित पवार ही जोडी अडीच वर्षे अनुभवली. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवारांना महाराष्ट्राने अनुभवले. महाराष्ट्राच्या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग़ृहमंत्री अमित शहा हे भाजपासाठी सर्वस्व पणाला लावणार, हे निश्चित आहे. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षासाठीही भाजपाला आपली यंत्रणा राबवावी लागणार आहे. आमची त्यांना मते मिळाली. पण त्यांची मते आमच्याकडे आली नाहीत, असा रडीचा डाव नंतर मांडून उपयोग होणार नाही.

शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, नाना पटोले या नेतृत्वाभोवती निवडणूक केंद्रित असणार आहे. राज ठाकरे नि मनोज जरांगे हे मतदारांना किती आकर्षित करतात, यावर निवडणुकीत चुरस वाढत जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त असे एकनाथ शिंदे ठासून सांगत होते. आता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. निकालानंतर ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी टूम पुढे आली, तर भाजपा सरस ठरू शकेल. महायुतीत भाजपा सर्वात जास्त जागा लढवणार आहे. महाआघाडीतही काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे पवार व ठाकरेंनी मान्य केले आहे. शिवसेना ही शिंदेचीच व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची असा निकाल जरी निवडणूक आयोगाने दिलेला असला तरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयात येत्या २० नोव्हेंबर रोजी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच हे सिद्ध करण्याची कसोटी शिंदे व अजित पवारांची आहे. विधानसभा निवडणुकीत पाहिजे त्या पक्षाचे तिकीट मिळाले नाही, तर इच्छुकांची इकडून तिकडे धावाधाव मोठी होईल. आता कोणी थांबायला तयार नाही हे वास्तव आहे. बंडखोरांना कसे थोपवायचे हे सर्वपक्षीय आव्हान आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago