मुंबई: बीएसएनएलच्या सध्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. खरंतर, जुलै २०२४मध्ये जेव्हापासून रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तेव्हापासून बीएसएनएलबद्दल खूप चर्चा केली जात आहे. आता बीएसएनएलने आणखी एका बाबतीत सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मागे सोडले आहे.
BSNL चा जलवा
खाजगी कंपन्यांकडून रिचार्ज प्लान्सचे दर ३० टक्क्यांनी वाढवल्यानंतर आता लोकांनी सोशल मीडियावर असे म्हणणे सुरू केले आहे की आता त्यांच्याकडे बीसएसएनएल हा एकमेव पर्याय राहिला आहे. लोक तर बीएसएनएलमध्ये आपला नंबर पोर्ट करण्याबाबतही बोलत आहेत. आंध्र प्रदेशातील राज्यांमधील अनेक जणांनी आपापले नंबर्स बीएसएनएलमध्ये पोर्टही केले होते. तसेच अनेक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत.
याबाबतीत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने जुलै महिन्यात एक डेटा जारी केला आहे. यात तुम्हाला सर्व काही समजेल. या डेटानुसार जुलैच्या महिन्यात वायरलेस सबस्क्रायबर्सची संख्या कमी होऊन १२०.५१७ कोटी झाली होती. तर जून महिन्यात ही संख्या १२०.५६४ कोटी झाली होती.
ट्रायच्या डेटानुसार खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर जुलैमध्ये सर्वाधिक नुकसान एअरटेलला झाले होते. भारती एअरटेलने १६.९ लाख युजर्स गमावले होते. तर वोडाफोन आयडियाने १४.१ लाख युजर्स गमावले होते. तर तिसऱ्या स्थानावर रिलायन्स जिओ होते. त्यांनी ७.५८ लाख युजर्स गमावले होते.
दुसरीकडे जुलै महिन्यात भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी अशी होती की ज्यांना ग्राहकांच्या बाबतीत नुकसान नव्हे तर फायदा झाला होता. जुलैमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर देशभरात २९.४ लाख ग्राहक जोडले गेले होते.