मुंबई : दोन दिवसाच्या अतिवृष्टीनंतर (Heavy Rain) पावसाने आज पहाटेपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र अजूनही काही भागात पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ही रिपरिप येत्या २४ तासात आणखी जोर पकडणार असून महाराष्ट्रासह काही राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
हवामान विभागाने देशातील महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात, गोवा आणि छत्तीगड या पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट (Red Alert) देखील जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील केले आहे.
याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट (Weather Update Orange Alert) जारी केला आहे. तसेच महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात कुठे कोसळणार पावसाच्या धारा ?
हवामान विभागाने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.
पुढील तीन दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज म्हणजेच सर्व शहरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये २१-२३ जुलैपर्यंत, रत्नागिरीत २१ आणि २२ जुलैला रेड देण्यात आला. तर २२ जुलै रोजी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.