मालेगाव : लोकसभा निवडणुकीत खानदेशसह उत्तर महाराष्ट्रात प्रचाराच्या अग्रभागी असलेल्या कांद्याने सत्तारुढ पक्षाला चांगलेच रडविले. निवडणुकीनंतरही कांद्याचे भाव स्थिर आहेत. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा भरुन ठेवला आहे. तालुक्यासह कसमादेत या वर्षी कडक उन्हाचा तडाखा जाणवला. भाववाढीच्या प्रतिक्षेत असतांनाच चाळींमध्येच कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
खानदेशमध्ये लाखो क्विंटल कांदा चाळींमध्ये शिल्लक आहे. भाव जैसे थे असून, उन्हाची तीव्रता असणाऱ्या भागात कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे. गेल्या वर्षी तालुक्यासह कसमादे परिसरात दुष्काळी परिस्थिती होती. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत कांद्याला चांगला भाव मिळाला होता. दिवाळीनंतर येथील बाजारात ४ हजार ३०० रुपयापर्यंत भाव गेला होता.
कांद्याला मिळत असलेला भाव पाहून त्यावेळी शेतकऱ्यांनी बाजरी, मका ही खरीपाची अर्धवट पिके काढून टाकत लेट खरीपात पावसाळी लाल कांद्याची लागवड केली होती. तसेच, उन्हाळी कांद्याच्या लागवडीची धूम सुरु असतानाच केंद्र शासनाने ८ डिसेंबरला २०२३ ला निर्यातबंदी लागू केली. तेव्हापासून कांद्याचे भाव कोसळले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांचा तीव्र रोष पाहता कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात आली. केवळ दोन दिवस कांद्याला अडीच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. महिन्यापासून अत्यंत कमी कांद्याला दोन हजाराच्या आसपास भाव मिळत आहे. सरासरी बाजारभाव १५०० रुपयाच्या आत-बाहेर आहे. कसमादेतील कांदा दर्जेदार आहे. यावर्षी वातावरण अनुकुल असल्याने कांद्याचे चांगले उत्पन्न झाले आहे.
चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा राखून ठेवला आहे. शहरासह कसमादे परिसरात गेल्या साडेतीन महिन्यापासून कडक ऊन पडत आहे. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील पारा ४० अंशापर्यंत आहे. कडक उन्हामुळे काही ठिकाणी कांदा चाळींमध्येच सडू लागला आहे. देशांतर्गत कांद्याचे उत्पन्न घटल्याने आगामी काळात भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत कांदा सडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कांदा सडण्याच्या भीतीने काही ठिकाणी शेतकरी मिळेल त्या भावात मालाची विक्री करीत आहेत. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी चांगल्या वातावरणामुळे उन्हाळी कांद्याचे गेल्या वर्षाएवढेच उत्पादन झाले आहे. जाणकारांच्या मते अजूनही ५० टक्क्यापेक्षा अधिक कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.
अपेक्षित भाव मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक देखील कमी झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत कांदा या एकमेव पिकावरच शेतीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. राखून ठेवलेल्या कांद्याला भविष्यात चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…