आकाश खूप पुस्तके वाचायचा. शाळेच्या ग्रंथालयातील कितीतरी पुस्तके त्याने वाचून संपवली होती. त्याला भुताखेताच्या, राजा-राणीच्या, राक्षस, परीच्या गोष्टी खूप आवडायच्या. त्या गोष्टी वाचताना तो इतका दंग व्हायचा की, कसलेच भान त्याला उरत नसे. एके दिवशी तो असेच एक राक्षस अन् परीचे पुस्तक वाचत होता. अन् वाचता वाचता गोष्टीत हरवून गेला होता.
तेवढ्यात आईने त्याला हाक मारली, ‘आकाश जरा इकडे ये रे’ तशी त्याची तंद्री भंग पावली. पुस्तक तसेच हातात घेऊन तो आईकडे आला. आई म्हणाली, ‘मी बाजारात जाऊन येते. कुकरच्या पाच शिट्या झाल्या की कुकर बंद कर.’ आकाशने ‘हो’ म्हटले अन् आणि आई बाजाराला निघून गेली. इकडे आकाशने पुन्हा पुस्तक उघडले. आता राक्षस अन् परीची घमासान लढाई सुरू झाली होती. परी आपल्या जादूई छडीचा वापर करून राक्षसाला लोळवत होती. पण, राक्षसदेखील तितकाच ताकदवान होता. तोही परीला माघार घ्यायला भाग पाडत होता. त्यामुळे त्याचा शेवट काही होत नव्हता. वाचता वाचता आकाश बेडरूममध्ये गेला. तिथेच पलंगावर पडून तो गोष्ट वाचू लागला.
आता शेवटची तुंबळ लढाई सुरू झाली. परीने जादूच्या छडीने आग पेटवली. त्यात रानातला विशिष्ट पालापाचोळा टाकला अन् भला मोठा जाळ तिथं निर्माण केला. परीने टाकलेल्या पालापाचोळ्याचा एक वेगळाच जळकट वास साऱ्या रानात पसरला. राक्षसाला हा विचित्र वास सहन होईना. त्या वासाने राक्षसाला चक्कर येऊ लागली. आकाशला कळेना, गोष्टीत जाळलेल्या पालापाचोळ्याचा वास आपल्याला कसा येतो. आता मात्र राक्षसाची सहनशक्ती संपली. तो दाणदाण पाय आपटत होता. जोरजोरात ओरडत होता. त्याचे ते ओरडणे, दाणदाण पाय आपटणे आकाशला अगदी स्पष्ट ऐकू येत होते. शेवटी परीने आपली मंतरलेली जादूची छडी राक्षसाला मारली अन् राक्षस जोराजोरात ओरडून गतप्राण झाला. गोष्ट संपली तरी जळका वास जाईना. त्याचे ते दाणदाण पाय वाजवणे अन् जोरजोरात ओरडणे संपेना. त्या आवाजाने आकाश भानावर आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपलं सारं घर धुराने भरून गेलंय. त्याचाच जळकट वास येतोय. बाहेर कुणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होतं. त्याने धावत जाऊन दरवाजा उघडला. अन् समोर पाहिले तर त्याच्या घरासमोर केवढी गर्दी जमली होती. दरवाजा उघडताच भरभर धूर घराबाहेर पडू लागला. आई तोंडावर पदर धरून चटकन किचनकडे धावली. अंदाजाने, सावधपणे गॅसजवळ गेली. अन् गॅस बंद केला. आईच्या पाठोपाठ अनेक शेजारी घरात शिरले. त्यांनी सर्व खिडक्या झटपट उघडल्या.
घरातला धूर आता बऱ्यापैकी कमी झाला होता. आईने पाहिले गॅसवर ठेवलेला कुकर पार जळून गेला होता. त्या काळ्याकुट्ट पडलेल्या कुकरकडे बघत आई म्हणाली, ‘अरे बाळा, आकाश वाचलास रे वाचलास. नशीब कुकरचा स्फोट झाला नाही.’ आकाशला काही झालं नाही हे आईच्या लक्षात येताच आईने आकाशच्या पाठीत धपाटा घातला अन् म्हणाली, ‘गधड्या तुला सांगितलं होतं ना, पाच शिट्ट्या झाल्या की, कुकर बंद कर म्हणून, तुला काही झालं असतं मग!’ शेजारी-पाजारी लोक कुणी आकाशला तर कुणी आईला दोष देत आपापल्या घरी निघून गेले. आता कुठे आकाशच्या लक्षात आले की तो जळकट वास, तो धूर, ते दाणदाण पाय वाजवणे गोष्टीतले नसून आपल्याच घरात होते.
‘सॉरी हं आई, यापुढे मी नक्कीच काळजी घेईन.’ आकाश काकुळतीने म्हणाला. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अन् पुस्तकांनी गच्च भरलेल्या पुस्तकांच्या कपाटाकडे बघत बघत आई स्वयंपाकघराकडे निघाली…!
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…