Categories: कोलाज

काय भुललासी…?

Share

ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा…

प्रियानी पाटील

संत चोखामेळा यांच्या या अभंगातून वरवरचं रूपडं आणि अंतरंग यांचा परस्पर काही संबंध नसतो या अर्थानेच माणसाचं वरवरच दिसणं आणि त्याचा स्वभाव यात कधी कधी जमीन अस्मानाचा फरक असू शकतो हे देखील तितकेच खरे आहे.

मग ती स्त्री असो अथवा पुरुष.

एक अंकल आपल्या जीवनातील किस्सा सांगताना आपल्या पत्नीची ओळख देताना म्हणाले, ही एकदम मनाने चांगली आहे. आहे गव्हाळ रंगाची पण तितकीच ती अंतरंगाने सोन्यासारखीच आहे. आपल्या पत्नीची ओळख देताना त्यांनी आपल्या चष्म्याची काच दोनदा पुसली. म्हणाले, लग्नात मुलगी पाहताना माझी दुसऱ्यांदा फसगत होऊ नये म्हणून मी हा नवा चष्मासुद्धा घेतला. त्यांच्या बोलण्यातून फसगत हा शब्द आला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तसे ते म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा मी मुलगी पाहण्यास गेलो होतो, तेव्हा मुलीला एका क्षणात पसंत केली होती. काय तो चेहरा, काय ते सौंदर्य वर्णन करताना तिच्या गोऱ्या म्हणण्यापेक्षा पांढऱ्या रंगाचं कौतुक करायला ते अजिबात विसरले नाहीत. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा न राहावल्यामुळे हे महाशय त्या मुलीला आठ दिवसांतच कुणालाही न कळवता तिच्या घरी भेटायला गेले. तेव्हा मुलगी दाखवायच्या कार्यक्रमात उपस्थित नसलेली एक व्यक्ती त्यांच्या नजरेस पडली. त्यांना वाटले

मुलीची मावशी किंवा आत्या असावी. त्यांनी तिला आपली ओळख देत म्हटले, मावशी… मावशी मी आलोय म्हणून सांगा मुलीला किंवा तिच्या वडिलांना किंवा आईला.

या मावशीला असं सांगताच ती हातातलं काम टाकून लाजली आणि आत पळणार इतक्यात मुलीची आई बाहेर आली. या महाशयांनी पुन्हा तोंड उघडले, म्हणाले, मावशी कुठे असतात, म्हणजे कार्यक्रमात नव्हत्या ना म्हणून म्हटले.

तशी मुलीची आई वरमली. म्हणाले, तुम्ही काय बोलताय. मुलीची ओळख आठ दिवसांतच विसरलात, तर जन्मभर काय सांभाळणार तुम्ही हिला? त्यांच्या लक्षात काही येईना. ते भांबावले. ते या मावशीकडे पाहतच राहिले. तशी ती आणखी लाजली.

तशी आई म्हणाली, ही काही कुणी मावशी नाही, माझी मुलगीच आहे आणि तुमची होणारी पत्नी. जा गं आत जा आणि चांगला परवासारखा मेकअप करून ये. तुझा होणारा नवरा तुझी ओळखच विसरून गेलाय. कसं व्हायचं पुढे तुमचं म्हणून ती हसायला लागली. भावी सासुबाईंचे हे बोलणे ऐकून हे अंकल एवढे धास्तावले की घामाने भिजले.

अरे हा काय प्रकार आहे? मुलीचा कार्यक्रमावेळचा पांढरा रंग आणि आताचा रंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. केवढी फसवणूक आहे, म्हणून अंकल काय समजायचे ते समजले आणि त्यांनी तिथून तत्काळ काढता पाय घेतला. आणि स्पष्ट नकार कळवला.

अंकलनी हा किस्सा सांगताना असंही म्हटलं शेवटी… मी त्या कार्यक्रमात मुलगी पाहायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मुलीला बिना मेकअप समोर आणली असती तरी मी एकवेळ पसंत केली असती, पण मेकअपच्या आतील चेहरा एक, वरवरचा रंग एक अशा प्रकारे केलेली ही फसवणूक माझीही होती आणि माझ्या घरातील माणसांचीही होती. जे आहे ते लपवायचं कशाला? मला फसवणूक बिलकूल मान्य नाही म्हणून मी ते लग्न मोडलं, असे अंकल स्पष्टच बोलले आणि त्यांनी एक सत्यता स्पष्ट केली.

सत्य आणि असत्याची बाजू मांडतानाही आपण सत्याच्या मार्गाने चालण्याचे धाडस दाखवले पाहिजे. नाही तर एक खोटं बोलता बोलता माणूस हजारदा खोटं बोलून ते पचनी पाडतो.

अलीकडे फोटो एडिटिंग करूनही असणं एक आणि दिसणं एक असं समीकरण बनू लागलं आहे. यामुळेही अनेकदा फसगत होऊ शकते. खरं तर रंग कोणताही असो, काळा किंवा गोरा यात भेद न मानता मनाच्या खऱ्या रंगाची ओळख पटवून घेतली पाहिजे. अंकलनी त्या मुलीला नकार देण्याचं कारण हे त्या मुलीचा रंग नव्हताच मुळी, तर त्यांच्याकडून झालेली फसगत हे होतं. हे कुणालाही सहज कळण्यासारखं होतं.

आपला रंग काळा असो अथवा गोरा आपल्या मनात असं न्युनगंड निर्माण जेव्हा होतं, तेव्हा इतरांपेक्षा आपण सरस दिसण्यासाठी असे नवनवीन रंग चेहऱ्यापासून मनापर्यंत तयार झालेले असतात. जे दुसऱ्यांना कमी लेखण्यापर्यंतही कधी कधी उमटतात.

रंगांच्या दुनियेत प्रत्येक रंग हा आपली ओळख घडवितो. माणसाच्या बाह्य रंगापेक्षा अंतरंग किती चांगले आहे हे जाणणे गरजेचे आहे. सफेद केसांना काळा रंग तारुण्य जपताना दिसतो. तारुण्याचा खरा रंग असतो तो मनाचा सच्चेपणा. जेवढं सच्चेपणानं वागलं जाईल तितकं समाधान मनाला लाभेल.

कधी कधी खोटं बोलणंही माणसाचा खरा रंग दाखवून जातो. उगाचच खोटं बोलण्याच्या सवयीमुळे माणूस समोरच्या माणसाचा विश्वास गमावून बसतो. खोटं बोलण्याची सवय लागू नये म्हणून घरातून लहानपणापासून चांगले संस्कार आवश्यक असतात. लहान मुलांना खोटं बोलू नये अशी शिकवण देऊन ती अंगीकारण्याची त्यांना सवय लावणंही तितकंच गरजेचे आहे.

रंग असो, स्वभाव असो तो पारदर्शक असणं आवश्यक असतो. खरं ते खरं, खोटं ते खोटं ठरवतानाही पारदर्शकता महत्त्वाची ठरते. आपणाला केव्हा पण चांगल्या गोष्टीच हव्या असतात. पण कधी कधी वाईट गोष्टी पदरी पडतात, तेव्हा त्या स्वीकारताना मन खट्टू होऊन जातं, पण जेव्हा त्याची खरी ओळख पटते तेव्हा आपण किती चुकीचा विचार करत होतो, हे लक्षात येते. बाह्यरंगापेक्षा अंतरंग सरस ठरते. दिखावा, फसवणूक, वरवरचे रंग यामध्ये अंतरंग कसे हे पाहणे जरुरी ठरते. आयुष्यात आपण वरवरच्या गोष्टींवर भुलण्यापेक्षा सच्चेपणाचे अंतरंग पारखणे गरजेचे आहे.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

14 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

16 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

36 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

56 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago