Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीराज ठाकरेंचे पक्षवाढीकडे लक्ष!

राज ठाकरेंचे पक्षवाढीकडे लक्ष!

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी आता पक्षवाढीकडे लक्ष दिले आहे. २३ ऑगस्टला मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. तर २५ तारखेपासून मनसे राज्यभरात सदस्य नोंदणी सुरु करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. त्यांनी सदस्य नोंदणीसह पक्षवाढीवर भर देण्याबाबत या बैठकीत चर्चा केली.

लोक सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहेत, लोक आपल्याला मत देण्यास तयार आहेत. लोक आपला विचार करत आहेत. म्हणून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा. आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांना पक्षाशी जोडा. योग्य रित्या काम केल्यास यंदा आपल्याला नक्की यश मिळेल, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.

यादरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

राज ठाकरे यांच्यावर २० जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत असल्याची माहिती होती. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ॲक्टिव मोडमध्ये आले असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढली होती. आता राज ठाकरे ॲक्टिवह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मध्यंतरीच्या काळात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना सोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे देखील लक्ष असणार आहे.

शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे-भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळाले ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधान परिषद आणि शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळाले होते. कारण भाजपच्या सांगण्यावरुन शिंदे गट मनसेत विलीन होणार यापासून ते नव्या सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चा सुरुच होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -