आता लक्ष्य गुजरात विधानसभा…

Share

प्रा. नंदकुमार गोरे

पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दोन दिवसांचा दौरा केला. त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. या शो दरम्यान लाखो लोक उपस्थित होते. या वेळी लोकांनी मोदी-मोदी, जय श्री राम आणि भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या. अहमदाबाद विमानतळावरून तासाभरात नऊ किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर मोदी भाजप कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांचं जंगी स्वागत झालं. मोदी यांनी राज्य भाजप मुख्यालयात सरकार आणि संघटनेचे नेते, भाजप खासदार आणि आमदारांशी चर्चा केली. ‘मेरा गाव, मेरा गुजरात’ कार्यक्रमात राज्यातले सव्वालाख सरपंच उपस्थित होते. तालुका आणि जिल्हा पंचायत, नगरपालिका सदस्यांना त्यांनी संबोधित केलं. खेळ महाकुंभाची सुरुवात केली.

महिलांचा मेळावा घेतला. खेळ महाकुंभात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या ४६ लाख युवक-युवतींनी नोंदणी केली होती. यावरून मोदी यांनी लाखो लोकांमध्ये जाऊन प्रचाराचा श्रीगणेशा केल्याचं स्पष्ट दिसतं. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलून मध्यंतरी सरकारविरोधातली नाराजी कमी करण्यात आली. कर्नाटक, मध्य प्रदेशबरोबरच गुजरातमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम राबवण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये बाळासाहेब थोरात आणि राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगलं यश मिळवलं होतं. भाजपला सत्तेत येण्यासाठी कसरत करावी लागली; परंतु निवडून आणलेल्या आमदारांना सांभाळता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये राजस्थान, छत्तीसगड वगळता काँग्रेसला कुठेही म्हणावं असं यश मिळवता आलेलं नाही. उलट, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाबसारखी राज्यं हातून गेली. या परिस्थितीत गुजरात काँग्रेसमधली गटबाजी संपायला तयार नाही.

गुजरातमधले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी एकूण परिस्थितीबाबतची व्यथा अलीकडेच बोलून दाखवली होती. भाजपला पराभूत करण्याइतकीही ताकद काँग्रेसमध्ये राहिलेली नाही. या वर्षाअखेर गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असताना काँग्रेसला आलेली ग्लानी अजून दूर झालेली नाही. शंकरसिंह वाघेला पुन्हा काँग्रेसमध्ये आले असले, तरी त्यांचा फारसा फायदा होणार नाही. काँग्रेसचे चाणक्य समजले जात असलेल्या अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. संपूर्ण गुजरातचं नेतृत्व करेल असा एकही नेता काँग्रेसकडे उरलेला नाही. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ‘आप’ने चालवला आहे. आम आदमी पक्षाने राज्यात तिरंगा यात्रा काढली. ‘आप’ गुजरातमध्ये एक नवीन पर्याय ठरेल, असं या पक्षाचे निमंत्रक गोपाल इटालिया आणि राज्याचे नेते इशुदान गढवी यांनी सांगितलं.

सततच्या स्पर्धा परीक्षा पेपरफुटीमुळे तरुण सरकारी नोकऱ्यांपासून वंचित आहेत आणि गुजरातमधल्या महिलांना महागाई आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे खूप असुरक्षित वाटत आहे. कमकुवत विरोधकांमुळे भाजप सरकारला मनमानी करण्याची संधी मिळाली असून राज्यातली शिक्षण आणि आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे, अशी टीका ‘आप’ने केली आहे. सुरत महापालिकेत मिळालेल्या जागांमुळे गुजरातमध्ये भाजपला ‘आप’ हाच पर्याय राहील, असा दावा केला जात आहे. पंजाबमध्ये मतदारांनी आम आदमी पक्षाला संधी देऊन नवं राजकारण सुरू केलं आहे, यातून देशात क्रांती होणार असल्याचे ‘आप’चे नेते सांगत आहेत.

सुरत आणि गांधीनगर महानगरपालिकेत चांगली कामगिरी केल्याने ‘आप’चं गुजरात युनिट खूप उत्साही होतं; परंतु सुरत महानगरपालिकेतले ‘आप’चे नगरसेवक आणि अन्य ज्येष्ठ नेते महेश सवानी, विजय सुवाला आदींनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाला ब्रेक लागला. पंजाबमधल्या विजयाने गुजरातमध्ये पक्षाला जणू बुस्टर डोस मिळाला. गुजरात विधानसभेसाठी पक्षाने पुन्हा एकदा पूर्ण उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे.

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व १८२ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट घेऊन रिंगणात उतरलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी तिकिटासाठी कोणताही नेता किंवा आमदार दावा करणार नसल्याचं अनेक वेळा सूचित केलं आहे. पक्ष ज्या नेत्याला तिकीट देईल त्याला विजयी करणं हे त्या त्या नेत्यांचं कर्तव्य असेल, असं ते म्हणाले.

पाटील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यांना विरोध करण्यासाठी गुजरात प्रदेश भाजपमध्ये एकही नेता नाही. याचा फायदा घेत अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी गुजरातमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यात विरोधकांची उपस्थिती कायम राहावी यासाठी धनानी यांनी राज्यातल्या जनतेला काही जागा भाजपला द्यायचं आवाहन केलं. त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली जात आहे.

दुसरीकडे, प्रसिद्ध उद्योजक आणि पाटीदार समाजाचे समाजसेवक नरेश पटेल यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार ‘आप’ करत आहे. आम आदमी पक्षाचं (आप) पुढील लक्ष्य गुजरात आहे. त्यामुळे त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे. दिल्ली दौऱ्यानंतर नरेश पटेल ‘आप’च्या संपर्कात असल्याची अटकळ जोर धरू लागली आहे. पक्ष त्यांचा दर्जा वाढवू शकतो आणि गुजरातमध्ये प्रवेशाचं दार उघडण्यासाठी त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवू शकतो. अलीकडेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनीही खुलं पत्र लिहून नरेश पटेल यांना राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचं आवाहन केलं होतं. नरेशभाई हे पाटीदार समाजाच्या खोडलधाम ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे राजकोटजवळ सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून माँ खोडलचं मंदिर बांधलं गेलं. नरेश पटेल हे अनेक दिवसांपासून राजकारणात येण्याचं ठरवत आहेत.

आपला समाज म्हणाला तरच राजकारणात उतरू, असं ते सांगत आहेत. सरदार पटेल ग्रुप आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समिती या पाटीदार समाजाच्या दोन प्रसिद्ध संघटना त्यांनी राजकारणात येण्याच्या बाजूने आहेत. काँग्रेस नेते भरतसिंह सोळंकी यांनी नरेश पटेल यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं; मात्र त्यांना कोणतीही घाई नाही. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करावा, असं काहींचं म्हणणं आहे. एकंदरीत, गुजरातमध्ये सध्या भरपूर आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भाजपला पर्याय देण्याचं सामर्थ्य कोणत्याही पक्षात दिसत नाही.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

13 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

14 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

15 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

15 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

15 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

15 hours ago