गेल्या काही वर्षापासून माध्यमजगत साक्षर झाल्याने सध्या अनेक आध्यात्म्याला वाहिलेल्या वाहिन्यांना चांगले दिवस आहेत. काही योगाद्वारे आपला माल विकण्याचा प्रयत्न करतात. काही धर्माच्या माध्यमातून मानवाचा भौतिक विकास होऊ शकतो, असे स्वप्न विकतात तर ‘इस्लामिक रिसर्च सेंटर’चे संस्थापक डॉ. झाकीर नाईक हे तरुणांना धर्माच्या नावावर भडकवतात. असा प्रथमदर्शनी तरी त्यांच्यावर आरोप आहे. ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी नाईक यांच्या भाषणाने प्रेरणा घेतल्याचे सांगितल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. यातून काय सिद्ध होईल ते होवो, पण धर्माच्या नावाने तरुणांची माथी भडकवणे कधीही चुकीचे आहे.
जागतिकीकरणानंतर भारतीय माणूस अधिक चंगळवादी बनला आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात वावरताना तो आत्मिक शांतता गमावून बसला आहे. अशा या आत्मिक शांतता हरवून बसलेल्यांच्या मोठ-मोठय़ा रांगा बाबा, बुवा, फकिरांकडे लागलेल्या असतात. ही भोंदूमंडळीही मग भस्माच्या नावाने काहीही अंगारे-धुपारे देऊन त्यांची रवानगी करतात. नागरिकही त्यानुसार आपली कृती, वर्तन करतात. त्यामुळेच की काय सरकारी कार्यालये असो वा निमसरकारी कार्यालयांतील कामाच्या ठिकाणी अशा मंडळींचे फोटो डकवलेले दिसतात. सार्वजनिक ठिकाणी आध्यात्म्याचा बाजार मांडलेला असतो. आध्यात्मला जगात मोठीच बाजारपेठ आहे. त्याचा फायदा अशा मंडळींकडून बरोबर घेण्यात येतो. झाकीर नाईक हे तसे थेट बाबा, महाराजांच्या पंक्तीत बसणारे नाहीत. पण त्यांच्या व्याख्यानात विखार प्रकर्षाने जाणवतो. भाजपा, विश्व हिंदू परिषद, एमआयएमच्या अनुक्रमे साध्वी निरंजना, उमा भारती, साध्वी ऋतांबरा, प्रवीण तोगडिया, ओवेसी बंधू यांच्या भाषणात इतर धर्माविषयी असलेला द्वेष, तिटकारा या नाईक यांच्या भाषणातूनही प्रतीत होत असतो.
जगातील कोणताही धर्म मानवाला हिंसा करण्यास प्रवृत्त करीत नाही. रामाने रहिमच्या नावे किंवा रहिमने रामाच्या नावे हिंसा करावी, अशी शिकवण धर्म देत नाहीत. व्यक्ती-व्यक्तीत, गटा-गटात, पंथ-पंथात, जाती-जातीत, धर्म-धर्मात विष पेरण्याचे काम काही मंडळी आपल्या व्ययक्तिक स्वार्थासाठी करीत असतात. त्यातूनच त्यांचे राजकारण, पर्यायाने दुकाने चालतात. त्यामुळे त्यांना समानता मान्य नसते. ती नांदू लागल्यास त्यांचे प्रयोजन संपते. म्हणूनच प्रत्येक धर्मातील काही विघ्नसंतोषी मंडळींकडून दुस-या धर्माबाबत विद्वेष पसरवण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू असते.
झाकीर नाईक हे चौकशीअंती दोषी आढळले तर त्यांना निश्चितच कठोरातही कठोर शिक्षा केली पाहिजे. पण हे करतानाच, विशिष्ट धर्म, विचारसरणी मान्य नसेल त्याला देहद्रोही म्हणणे, आम्ही सांगतो तेच तुम्ही खाल्ले पाहिजे, असा आग्रह धरणे ही बाब व्यापक हिंसेच्या समांतर जाणारी आहे. त्याबाबतही आता केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. झाकीर नाईक यांच्या भडकावू भाषणांचा अभिनेता अमिर खाननेही समाचार घेतला आहे. रझा अकादमीनेही नाईकविरोधात निदर्शने केली आहेत. लोकशाहीला मानणारा कोणीही त्यांच्या भाषणांचे समर्थन करणार नाही. पण नाईक यांच्या निमित्ताने दोन जाती-धर्मात तेढ वाढवणा-यांना संरक्षण देणे हे दुस-या नाईकांना जन्म दिल्यासारखेच आहे, नाही का? जागतिक कीर्तीचे महाकवी डॉ. मुहम्मद इक्बाल यांनी,
‘ मुहब्बत ही से पायी है शफा कौमोंने
किया हे अपने बख्ते सुफ्ता को बेदार कौमोंने’
या शेरमधून राष्ट्रे प्रेमाच्या बळावरच जगतात व भाग्यवंत ठरतात, असे प्रतिपादन केले आहे. आणि ते खरेही आहे. आपण कोणत्या मार्गाने गेल्यास आपली उन्नती होणार हा प्रत्येकाने सदसद्विवेकाने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.