येसूबाईंना अतिशय दु:खाचे आणि अपमानाचे जिणे जगावे लागले. कैद्याची बायको म्हणून लोक त्यांना हिणवत असत. हळदीकुंकू किंवा इतर समारंभाला त्यांना बोलवत नसत. कधी माहेरी गेल्या तर ‘माहेरला भार झालेली स्त्री’ म्हणून त्यांना टोमणे मारत.
येसूबाई स्वत: क्रांतिकारक नव्हत्या, पण ज्या कुटुंबात त्यांचा विवाह झाला त्या कुटुंबातील तिघे भाऊ स्वातंत्र्यसैनिक होते. सर्वात मोठे गणेश म्हणजे बाबारावमधले विनायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि धाकटे म्हणजे बाळाराव सावरकर या तिघांचाही स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठा सहभाग होता. यशोदा आणि येसूबाईंचा जन्म १८८५ साली त्र्यंबकेश्वरच्या फडके कुटुंबात झाला. लग्नापूर्वी त्यांना शिक्षण मिळाले नव्हते. १८९६ साली त्यांचा बाबाराव सावरकरांशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दीराने म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहायला वाचायला शिकवले.
सावरकरांचे घराणे सधन जमीनदारांचे होते. लग्नानंतर थोडयाच दिवसात बाबाराव शिक्षणासाठी नाशिकला गेले. तिथे त्यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला. संन्यासी होण्याचे विचार त्यांच्या मनात घोळत होते. नाशिकला प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९८ मध्ये ते भगूरला आले. पण भगूरलाही प्लेग सुरू झाला. येसूबाईचे सासरे आणि चुलत सासरे त्यात मरण पावले. धाकटया बाळालाही प्लेगची लागण झाली. तेव्हा बाबाराव आणि येसूबाईंनी अविश्रांत श्रम करून त्यांचा जीव वाचवला. बाबारावही प्लेगच्या तावडीत सापडले ते कसेबसे वाचले.
वडिलांच्या निधनानंतर आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे भगूर सोडून सावरकर मंडळी नाशिकला आली. कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी बाबारावांवर पडली. धाकटया भावांना शिक्षण देण्यासाठी त्यांना खडतर परिश्रम करावे लागले. येसूबाईंची त्यांना साथ होतीच. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी त्यांना दागिने विकावे लागले.
सावरकर बंधूंच्या राजकीय हालचाली आणि सहकारी क्रांतिकारकांच्या बरोबर होणा-या चर्चा संवाद येसूबाई ऐकत होत्या. त्याचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. तेव्हा त्यांना पाठिंबा देऊन आपणही काही करावे असा त्यांनी निश्चय केला. फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. त्याबरोबरच आत्मनिष्ठ युवती संघ या नावाने महिलांचा गट स्थापन केला आणि जे क्रांतिकारक पकडले जात त्यांच्या कुटुंबीयांना या गटातर्फे मदत केली जात असे. मार्च १९०९ मध्ये पोलिसांनी बाबारावांना अटक करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमध्ये अटक करून जन्मठेपेची शिक्षा झाली धाकटे नारायणराव यांनाही सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली.
या सर्व खडतर काळात येसूबाईंनी विलक्षण धैर्याने सर्व संकटांशी सामना केला. सावरकर कुटुंबाची सर्व मालमत्ता जमा केली. नाशिकच्या घरावर धाड घालून स्वयंपाकाच्या भांडयाकुंडयासह सर्व वस्तू जप्त केल्या. येसूबाईंना आश्रय दिला, तर सरकारची आपल्यावर अवकृपा होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील म्हणून त्यांच्या नाशिकमधल्या मामांनी आधार दिला नाही.
सहा महिन्यांची शिक्षा भोगून झाल्यानंतर नारायणरावांना मुंबई प्रांतातील सर्व महाविद्यालयांनी प्रवेश दिला नाही. त्यामुळे ते कोलकात्याला गेले १९१६ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते मुंबईला आले तेव्हा येसूबाई त्यांच्या कुटुंबाबरोबर राहू लागल्या. तोपर्यंत त्यांना अतिशय दु:खाचे आणि अपमानाचे जिणे जगावे लागले. कैद्याची बायको म्हणून लोक त्यांना हिणवत असत. हळदीकुंकू किंवा इतर समारंभाला त्यांना बोलवत नसत. कधी माहेरी गेल्या तर ‘माहेरला भार झालेली स्त्री’ म्हणून त्यांना टोमणे मारत. परंतु येसूबाईंनी स्वत: हे सर्व सहन केलंच पण त्याबरोबरच ज्या क्रांतिकारकांच्या कुटुंबांना असं अपमानास्पद जीवन जगावं लागलं त्यांनाही त्यांनी खंबीरपणे आधार दिला. मुंबईत स्थायिक झाल्यावर अंदमानच्या कोठडीत शिक्षा भोगणा-या आपल्या नव-याला भेटण्याची परवानगी मिळावी असा अर्ज त्यांनी ब्रिटिश शासनाला केला. परंतु त्यांचे सर्व अर्ज फेटाळण्यात आले.
१९१८ च्या शेवटी नाशिकमध्ये असताना त्या आजारी पडल्या. त्या आजारपणात त्यांना सारखे भास होत असत, आपले यजमान परत आले असून ते दरवाजापाशी उभे आहेत असा त्यांना भ्रम होत असे. तेव्हा त्या शांताबाईंना म्हणजे आपल्या धाकटया जाऊबाईंना बाबारावांचे ओवाळून स्वागत करून घरात घेण्यास सांगत ८ फेब्रुवारी १९१९ या दिवशी येसूबाईंना बाबारावांना भेटण्याची परवानगी दिली असल्याचे ब्रिटिश सरकारचे पत्र नारायणरावांना मिळाले. पण त्या आधीच ५ फेब्रुवारीला येसूबाईंचे निधन झाले होते. शेवटपर्यंत त्यांना भेट मिळालीच नाही. चौतीस वर्षाच्या आयुष्याचा शेवट असा दु:खद झाला.
येसूबाईंनी कधीही सार्वजनिक चळवळीत भाग घेतला नाही. त्यांनी भाषणे दिली नाहीत किंवा लेखन केले नाही. परंतु आपला नवरा व दीर यांच्या कामात त्यांना पूर्णपणे साथ केली. स्वदेशीचा प्रचार पोलिसांच्या धाडींना तोंड देणे आणि आत्मनिष्ठ पुरती संघ या स्त्रियांच्या चळवळीत काम करणे असे त्यांच्या कार्याचे स्वरुप होते. १९०५ मध्ये स्वदेशी चळवळ सुरू होती तेव्हा फक्त स्वदेशीच वस्तू वापरण्याची शपथ त्यांनी घेतली. त्या काळात परदेशातून साखर येत होती, म्हणून साखर खाणे त्यांनी सोडून दिले.
आजारपणात हात सुजल्यामुळे परदेशी बनावटीच्या बांगडया घालण्यास नकार दिला. त्याऐवजी काळेमणी दो-यात ओवून तयार केलेल्या घरगुती बांगडया शेवटपर्यंत वापरल्या. ज्यावेळी पोलिसांची धाड आली, त्यावेळी मोठया चातुर्याने त्याची व्यवस्था लावली. नाशिकच्या आजुबाजूच्या भागात अनवाणी हिंडून स्वदेशीचा प्रचार करत. अभिनव भारताच्या सर्व सदस्यांना कैद करून शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. त्यांच्या पत्नी बहिणीमाता या सर्वाना एकत्र करून बाबारावांनी प्रकाशित केलेली देशभक्तीपर गाणी त्यांचे नैतिक धैर्य उंचावण्यासाठी गात त्यामुळेच गाणी टिकली. अशा प्रकारचे योगदान देऊन ख-या अर्थाने हिंदू कुटुंबातील स्त्रीची परंपरागत भूमिका बजावली, त्यामुळे तिन्ही भावांना सार्वजनिक कार्यासाठी काम करता आले.