महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रकारांत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामात लैंगिक छळ झाल्याची तक्रार केलेल्या केंद्र सरकारच्या सेवेतील महिला कर्मचा-यांना ९० दिवसांची पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली- महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रकारांत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामात लैंगिक छळ झाल्याची तक्रार केलेल्या केंद्र सरकारच्या सेवेतील महिला कर्मचा-यांना ९० दिवसांची पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी तीस दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
महिलेने तक्रार केलेल्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत महिला कर्मचा-यांना पगारी रजा देण्यात येईल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी २०१३ मध्ये कायद्याची निर्मिती करण्यात आली. या कायद्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराची तक्रार करणा-या महिला कर्मचा-यांना आता ९० दिवसांची रजा मिळेल.
लैंगिक अत्याचाराची तक्रार करताना महिला कर्मचा-यांच्या मनात भीतीची भावना असते. तरीही महिला कर्मचारी हिंमत एकवटून लैंगिक अत्याचाराची तक्रार करतात. मात्र कार्यालयात येत असल्याने आरोपी व्यक्तीकडून या महिलांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जाऊ शकते किंवा त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळेच या महिलांना संबंधित प्रकरणाची तक्रार केल्यानंतर ९० दिवसांची पगारी रजा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रजेचा समावेश महिला कर्मचा-यांना देण्यात येणा-या वार्षिक रजांशी असणार नाही.
पीडितेला या रजेची शिफारस अंतर्गत समिती आणि स्थानिक समितीकडून केली जाऊ शकते. आरोपीची चौकशी करण्यात आल्यानंतर अंतर्गत समिती आणि स्थानिक समितीकडून पीडित महिलेच्या रजेची शिफारस करू शकता येते. या पीडित महिला कर्मचा-यांना देण्यात येणारी रजा त्यांच्या वार्षिक रजांमधून वजा करण्यात येऊ नये, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.
कार्यालयांमध्ये महिला कर्मचा-यांवर होणा-या लैंगिक अत्याचारासंबंधी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने डिसेंबरमध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची चौकशी ३० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत यासाठी ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू नये, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.