सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान आणि कमलनयन बजाज फाउंडेशन यांनी केलेल्या आर्थिक साहाय्यातून सेवाग्राम वस्ती परिसरात तलावाचे बांधकाम करण्यात आले.
वर्धा- सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान आणि कमलनयन बजाज फाउंडेशन यांनी केलेल्या आर्थिक साहाय्यातून सेवाग्राम वस्ती परिसरात तलावाचे बांधकाम करण्यात आले. यात दीड किलोमीटर लांबीचा ३० मीटर रुंद, १० मीटर खोली असलेला नाला बांधला असून जलाशय तयार केला आहे.
‘जलयुक्त शिवार योजने’त याचे काम करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात पानीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे सांगण्यात येते. मागील दोन वर्षापासून दुष्काळी स्थिती असल्याने परिसरातील नागरिकांना पाण्याची टंचाई अनुभवावी लागत होती.
आश्रम प्रतिष्ठान व कमलनयन बजाज फाउंडेशन यांनी नाला बंडिंग करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली. तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, तहसीलदार राहुल सारंग, कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती, आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव डॉ. श्रीराम जाधव, नई तालीमचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
येथे आता मुबलक पाणीसाठा असून पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. नाला बंडिंगमुळे पुराचा धोका कमी झाला आहे. नुकत्याच झालेल्या जोमदार पावसानंतर नाला बंडिंगमुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
ठिकठिकाणी पाणी अडले. गावातील वाहून येणारे पाणी आश्रमाने बनशेतीत केलेल्या शेततळ्यात साठले असून शेततळे तुडुंब भरले आहे. महेंद्र फाटे, ऋषिकेष पवार, विजय धुमाळे, भावेश चव्हाण, बाबाराव खैरकर, सुशील फत्तेपुरिया, ढोले यांनी सहकार्य केले.