वरुणराजाचे आगमन यंदा काहीसे उशिराने झाले आहे. मात्र जेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे, तेव्हापासून तो मुसळधारपणे कोसळत आहे. त्यामुळे यंदा तरी मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्णपणे भरतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मागील वर्षी पावसाने मारलेल्या दडीनंतर यंदा उन्हाळयात पाण्यासाठी सर्वाचीच वणवण झाली होती.
मुंबईकरांनाही पहिल्यांदाच पाणीटंचाईची झळ बसली होती. यामुळे यंदा धरणे भरली तरी पाण्याने आपली किंमत काय असते, हे सर्वाना दाखवून दिल्याने यंदा सारेच पाण्याचा वापर जपूनच करणार आहेत. पाणीटंचाईने आपल्याला काय शिकवले? याचा विचार जर सर्वानी अंतर्मुख होऊन केला, तर पाण्याची किंमत काय असते, याचे उत्तर सर्वाना सहज सापडेल.
२०१५ सालचा मान्सून तसा उशिरानेच दाखल झाला होता. मात्र तरीही तो सर्वाचा निरोप घेईपर्यंत चांगला बरसेल आणि निदान मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी धरणे तरी पूर्ण भरतील, अशी आशा सगळयांनाच होती. मात्र पावसाने मागील वर्षी आपले महत्त्व काय असते, हेच कदाचित दाखवून द्यायचे ठरवले होते. त्यामुळे पावसाळा संपत आला, तरीही धरणक्षेत्रात मात्र तो म्हणावा तसा बरसलाच नाही.
दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के कमी पाऊस मागील वर्षी पडला आणि यामुळे साधारणपणे खेडया-पाडयातच पडणारा आणि मुंबईकरांनी फक्त ऐकलेला दुष्काळ पहिल्यांदाच प्रत्यक्षात अनुभवला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यामुळे सक्तीची पाणीकपात लागू करण्यात आली. परिणामी ठाण्यातील उल्हासनगरसारख्या उपनगरांमध्ये तर पाण्यासाठी चक्क मारामा-या झाल्या.
कधी नव्हे तो पाऊस मुंबईकरांना खूप काही शिकवून गेला. मुंबईकरांनी पाणीटंचाई फक्त ऐकली होती, टीव्हीवर पाहिली होती. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र ही टंचाई दरवर्षी सर्वसामान्यांना त्रासून सोडते. हंडाभर पाण्यासाठी चार-पाच वर्षाच्या चिमुकल्या पावलांपासून ते अगदी नववधूपर्यंत सारेच कामाला लागतात. आपल्याच लग्नात पाणी भरण्यासाठी एक नववधू लग्नाच्या जोडयातच डोक्यावर हंडे घेऊन चालल्याचे छायाचित्र याच वर्षी पाहायला मिळाले होते.
मुंबईकरांना ज्या धरणांतून पाणीपुरवठा होतो, ती बहुतांशी धरणे ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात आहेत. मात्र तरीही शहापूर तालुका कायम तहानलेला असतो. याचे कारण म्हणजे ही धरणे उभारताना शहापुरातल्या ज्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या, त्यांना नंतर याच धरणाचे हंडाभर पाणीही दिले गेले नाही. त्यांचे म्हणावे तसे पुनर्वसनही झालेले नाही. हा त्याग त्यांनी मुंबईकरांसाठी केलेला आहे, हे मुंबईकरांना कदाचित माहीतही नसेल. हे नागरिक, मुंबईकरांचे जलदूत दरवर्षी पाण्यासाठी अनेक किलोमीटरची वणवण करत असतात.
ठाणे जिल्ह्यातल्याच उल्हासनगर, अंबरनाथसारख्या शहरांमध्येही परिस्थिती काही वेगळी नव्हती. उल्हासनगरमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते-नगरसेवकांमध्ये पाणीवाटपावरून मारामा-या झाल्या. पाण्याची कपात जाहीर करण्यात आल्याने पाणी पुरत नव्हते. त्यामुळे मग बोअरिंग खोदण्यास परवानग्या देण्यात आल्या. मात्र त्यानंतर त्याचाही इतका अतिरेक झाला, की शहराची भूजल पातळी खालावली आणि या बोअरिंग बंद कराव्या लागल्या. उपनगरेच कशाला, ठाणे महापालिकेच्या हद्दीतील विभागांमध्येही पाण्यासाठी नागरिकांची वणवण झाली.
कळवा, मुंब्य्रासारख्या भागावर पाणीपुरवठयात अन्याय होत असल्याची ओरड झाली. त्यातून रेल्वेच्या धरणाचे पाणी ठाणे पालिकेला देण्याची मागणी समोर आली. यातही राजकारण रंगले. शिवसेना नवी मुंबईसाठी, तर मनसे ठाण्यासाठी सरसावली. सरतेशेवटी दोन्ही पालिकांना हे पाणी देण्यास रेल्वेने मंजुरी दिली. मात्र प्रत्यक्षात हे पाणी गढूळ असल्याने ते नागरिकांच्या कितपत उपयोगी पडले हा संशोधनाचाच विषय आहे.
रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास ति तील अनेक तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. कुठे निसर्गाने केलेला अन्याय थलीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. रायगड जिल्ह्या आहे, तर कुठे यंत्रणेने. कर्जत-खोपोलीसारख्या भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. या पाडयांमध्ये ना पाण्याची लाईन आहे, ना जवळपास एखादी विहीर. त्यामुळे येथील आदिवासी महिला पोरा-बाळांसह डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट दररोज करत असत. यातून मग राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी या पाडयांना पाणी पुरवण्याचे ठरवले. कर्जतमधील जैन बांधवांनी यात उल्लेखनीय कार्य केले.
जवळपास शेकडो पाडयांना त्यांनी टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवले. यात प्रसंगी पदरमोड करावी लागली, तरी त्यांनी माघार घेतली नाही. दुसरीकडे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने या भागात विहिरींची स्वच्छता करण्याचे मोठे काम केले. त्यामुळे या विहिरींचे बुजलेले झरे पुन्हा जिवंत झाले. पावसाला सुरुवात झाल्यानंतर आता या विहिरी हळूहळू भरू लागल्या आहेत. त्याचा फायदा मागील वर्षी पाणीटंचाईने होरपळून निघालेल्या हजारो नागरिकांना होणार आहे.
रायगड जिल्ह्यातल्या खारेपाटणसारख्या भागात असलेली टंचाई मात्र यंत्रणेने निर्माण केलेली आहे. या भागात विपुल प्रमाणात पाणी आहे. त्यासाठी नळपाणी योजनाही राबवण्यात आली होती. मात्र ती पूर्णच झाली नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी या भागातील नागरिकांची अवस्था झाली आहे. ही अवस्था यंत्रणेने केली आहे. निदान यावर्षी तरी ती परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे.
यंदा उन्हाळयात दुष्काळी भागात ओढे-नद्यांचे खोलीकरण, तलावांची स्वच्छता, विहिरींचे खोलीकरण अशी अनेक कामे सामाजिक संस्था, तसेच सरकारनेही लोकसहभागातून केली. या कामांचे फळ पहिलाच पाऊस पडल्यानंतर नागरिकांना मिळाले आहे.
मराठवाडयासारख्या मागील काही वर्षापासून सातत्याने दुष्काळ असलेल्या भागात तर नागरिकांनी ओढयात जमलेले पाणी पाहून जणू सुटकेचा नि:श्वासच टाकला. लोकांच्याच मेहनतीने दरवर्षी वाहून जाणारे हे पाणी यंदा त्यांना वर्षभर पुरणार आहे. या पाण्यातून त्यांचा दुष्काळ नक्कीच मोठया प्रमाणात दूर होणार आहे. अनेकांचे जळून गेलेले मळे पुन्हा फुलणार आहेत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व या नागरिकांना पुन्हा सांगण्याची गरज पडणार नाही.
एकंदरीत, यंदा पावसाने आत्तापर्यंत तरी समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र पाऊस पडला, धरणे भरली तरी मुंबईत दुष्काळाची आठवण राहील का? हा खरा प्रश्न आहे. पाऊस आला, धरणे भरली, आता वर्षभर काळजी करण्याची गरज नाही. खुशाल फ्लश सोडा, असा विचार जर मुंबईकरांनी केला, तर लवकरच मुंबईकरही डोक्यावर हंडे घेऊन जातानाचे चित्र दिसेल. त्यामुळे मागील वर्षीच्या टंचाईने आपल्याला जे काही धडे शिकवले, ते विसरून चालणार नाही.
आत्तापर्यंत पावसाची कामगिरी समाधानकारक राहिली आहे, मात्र ती अशीच राहील, याचा काही नेम नाही. यंदाही जर पावसाने आपल्याला अद्दल घडवायची ठरवली, तर मात्र परिस्थिती कठीण होऊन बसेल. त्यामुळे पाणी कितीही असले, तरी पाण्याचा वापर सर्वानीच जपून करण्याची गरज आहे.
कारण आपण जेव्हा १० लिटरचा फ्लश खुशाल सोडून मोकळे होतो, तेव्हा हेच दहा लिटर म्हणजे हंडाभर पाणी आणण्यासाठी ग्रामीण भागातल्या महिला मुलांना कडेवर घेऊन १०-१० किलोमीटरची पायपीट करतात, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनो, टंचाईने आपल्याला काय शिकवले, हे नेहमी लक्षात असून द्या आणि पाण्याचा वापर जपून, समजूतदारीने करा!