फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवडय़ातच उन्हाची तीव्रता हळूहळू जाणवू लागली आहे.
खेड- फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवडय़ातच उन्हाची तीव्रता हळूहळू जाणवू लागली आहे. ही तीव्रता येणा-या आगामी महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढून याचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गाव वाडय़ांमधील नैसर्गिक जलस्त्रोतांना बसणार आहे. या वर्षी देखील पाणीटंचाई रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असून तयार करण्यात आलेल्या कृती आराखडय़ात ३५ गावे व ५५ वाडय़ांचा समावेश केला गेला आहे.
खेड तालुका फेब्रुवारी ते जूनचा पहिला आठवडा हा तहानलेलाच राहत असल्याचे गेले अनेक वर्षापासूनचे चित्र कायम आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पहिला टँकर धावण्याची परंपरा देखील या तालुक्याकडे आहे.
पाणीपुरवठय़ाशी निगडित असलेल्या अनेक पाणी योजना राबवून देखील उन्हाळा या हंगामात प्रशासनाला टँकरद्वारे गाव, वाडय़ांची तहान भागवावी लागते. त्यामुळे दरवर्षी अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून देखील पाणीटंचाईचे ग्रहण गेले अनेक वर्ष सुटतच नसल्याचे वास्तव आहे.
काही गावे ही भौगोलिकदृष्टय़ा कडय़ाकपारीत वसली असल्याने त्या ठिकाणी असलेले नैसर्गिक जलस्त्रोत आटत जात असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. काही ठिकाणच्या ग्रामस्थांना तर पाण्यासाठी दहा दिशा भटकून तहान भागवावी लागत असल्याचे गेल्या अनेक वर्षापासूनचे चित्र आजही कायम आहे.
उन्हाळा कालावधीत सर्वात जास्त टंचाईग्रस्त असलेल्या खेड तालुक्यातील धनगर वाडय़ांना पाणीटंचाईचा फटका बसतो. त्यामध्ये खवटी-धनगरवाडी, तुळशी- धनगरवाडी, कुबजई या वाडय़ांचा प्रामुख्याने समावेश आहे. उन्हाची काहिली वाढली की, याच वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपते. मात्र यावर्षी पावसाची सरासरी वाढलेली असताना देखील टँकर सुरू होण्यासाठी मार्च उजडणार असल्याचे चित्र आहे, अद्यापि प्रशासनाकडे एकही अर्ज दाखल झालेला नाही.
यावर्षीचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करून ३६ गावे, ५५ वाडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र जि.प., पं.स. निवडणूक प्रक्रियेच्या कामात येथील प्रशासन गुंतल्यामुळे या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. गतवर्षी मार्च ते जून या कालावधीत ४४ लाख ९० हजार रुपयांचा निधी टँकरसाठी खर्ची टाकण्यात आला. ३० गावे ७४ वाडय़ांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागली होती. या वर्षी देखील हे चित्र कायम राहणार आहे.
पाणीटंचाईबाबत अनेक पाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात उन्हाळा कालावधीत पाणीटंचाईचे चटके येथील ग्रामस्थांना सहन करावे लागतात. पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे तालुका उन्हाळा कालावधीत तहानलेलाच राहत आहे.
टंचाईग्रस्त हा शिक्का गेली अनेक र्वष खेड तालुक्यावर बसला असून पाणीटंचाईबाबत ठोस उपाययोजना अद्यापि प्रभावीपणे तयार करण्यात न आल्याने या वर्षी देखील पाणी टंचाई डोळय़ांत पाणी आणणार असल्याची शक्यता आहे.