काही किरकोळ अपवाद वगळता मुंबईसह राज्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. काही भागात बोगस मतदान तर काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते.
मुंबई– मुंबईसह १० महापालिका आणि दुस-या टप्प्यातील ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणा-या ११८ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. काही किरकोळ अपवाद वगळता मुंबईसह राज्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. काही भागात बोगस मतदान तर काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते.
काही भागात बोगस मतदानाच्या घटना समोर आल्या आहेत.
तब्बल ११ लाख नावे यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत.
अनेक प्रभागात मतदारांची दुबार नावे असल्याचे निदर्शनास आले.
अनेक ठिकाणी पत्नीचे नाव एका यादीत तर पतीचे नाव दुस-या यादीत आहे. काही ठिकाणी पत्नीचे नाव आहे मात्र पतीचे नाव गायब आहे. त्यामुळे नेमके कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे, कोणत्या यादीत आपले नाव असेल, असे अनेक प्रकारचे संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाले.
राज्यातील १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणा-या ११८ पंचायत समित्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३ हजार २१० जागांसाठी १७ हजार ३३१ उमेदवारांमध्ये लढत झाली.
मुंबई
लालबाग येथे प्रभाग क्रमांक २०५ मधील अभ्युदय नगरमधील शिवाजी हायस्कूलमध्ये मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे, पहिल्या दीड तासातच प्रत्येक केंद्रावर सुमारे १० टक्के मतदान झाले.
मुलुंड येथील मतदान प्रक्रिया संथ गतीने असल्याने तरुण उत्कर्ष नगर केंद्रावर मतदारांचा संताप आहे. सुमारे तासभर मतदान केंद्रावर गोंधळ सुरु होता.
भायखळा पूर्वेकडील महापालिका शाळेतही मतदानादरम्यान अडचणी आल्या. मतदारांच्या स्लीपवर वर्गांचे खोली क्रमांक लिहिण्यात आल्यामुळे व मतदान केंद्र क्रमांक छोट्या अक्षरात लिहीण्यात आल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. तर बूथ क्रमांक ११ येथील मशीन बंद पडल्याने तेथील मतदानही काही काळ थांबले. हा गोंधळ पाहून सर्व पक्षीय उमेदवारांनी केंद्रावर धाव घेतली.
नाशिक
मतदान केंद्र क्र १५/६ येथे मशीनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मतदान खोळंबले. मत नोंद होत नसल्याचे लक्षात आल्याने अधिका-यांनी त्या मतदान केंद्रावर धाव घेतली. तसेच नाशिक शहरामधील एका मतदान केंद्रावरील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर अखेर अर्धा तासांच्या प्रयत्नांनंतर मतदान सुरळीत सुरु झाले.
नागपुर
नागपुरात बोगस मतदान केल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ३८ मधील यशोदा नगर शाळेत बोगस मतदान झाले. कुलकर्णी नावाच्या वयोवृद्ध महिलेच्या नावाने मतदान झाले. आधीच मतदान झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मात्र नंतर त्यांचे टपाली मत घेण्यात आले.
पुणे
पुण्यातही काही ठिकाणी गोंधळ उडाला. काही ठिकाणी मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी मतदान केंद्र सापडत नाही तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदारांना वेगवेगळे मतदान केंद्र असल्याचे निदर्शनास आले.
कोल्हापूर
कोल्हापुरातही तिच परिस्थिती आहे. शिये इथील हनुमाननगर इथे मतदान केंद्रावर आधार कार्ड ओळखपत्र म्हणून स्वीकारत नसल्याने मतदान प्रक्रिया नागरिकांनी थांबवली होती.